Thursday, 24 April 2025

बी ॲज यू आर - पुस्तक परिचय

रमण महर्षी हे अलीकडच्या काळातील एक एनलाईटन्ड मनुष्य होते. हे या पुस्तकातून झळकतंच म्हणजे. यामध्ये प्रश्नोत्तरे आहेत. त्यांच्याकडे लोक यायचे, प्रश्न विचारायचे, समस्या सांगायचे. त्याअनुषंगाने त्यांनी दिलेली उत्तरं आहेत. समोरच्या मनुष्यानं ज्या पातळीवरून प्रश्न विचारला आहे, त्या पातळीवर पोहचून उत्तरं दिलेली आहेत. म्हटलं तर खूप डीप फिलॉसॉफीकल डिस्कशन्स आहेत, म्हटलं तर अगदी साधे सरळ सोपे संवाद आहेत.

त्यांची ही उत्तरं/चर्चा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याकाळी लिहून ठेवलेली, त्यांचं कलेक्शन नंतर वेगवेगळ्या पुस्तकांच्या रूपाने प्रकाशित झालं. (मराठीत नॅशनल बुक ट्रस्टनं प्रकाशित केलेलं 'रमण महर्षी', तसेच प्रज्ञा सुखटणकर यांनी मराठीत भाषांतरित केलेली काही पुस्तकं आहेत.) पण हे "बी ॲज यू आर" हे इंग्रजी पुस्तक फारच चांगलं आहे. डेव्हिड गॉडमन या त्यांच्या शिष्याचे प्रचंड कष्ट यापाठीमागे आहेत. या पुस्तकाबाबत असं म्हणायचा मोह होतो की हे वाचलं तर स्पिरीच्युॲलिटीसंबंधी इतर कुठल्या पुस्तकाची आवश्यकताच वाटत नाही.

विचारले गेलेले प्रश्न क्वालिटीचे आहेत. त्यावर महर्षींची उत्तरं 'हटके' आहेत.‌ ही उत्तरं अवाक् करतात. मौन करतात. म्हणजे शब्दांची अर्थवहनातील मर्यादा लक्षात घेता, जे शब्दांच्या सहाय्याने जे सांगणं अशक्य आहे, तेही पोचवण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालेले दिसतात.

ते उपदेश मोड टाळून मनाचं जंजाळ नेमकं कसं काम करतं, हे उलगडून दाखवण्यावर भर देतात. काही वेळा ते प्रश्नकर्त्यालाच एखादा मार्मिक (रामबाण) प्रश्न विचारतात आणि त्याला जोडून हळूहळू उपप्रश्नांची लड लावतात. त्या प्रश्नांचा मागोवा घेत जाण्यातून प्रश्नकर्त्याला स्वतःलाच उत्तरापर्यंत जाण्याचं सुचवतात. 'मी कुणीतरी गुरू बसलोय इथे, आणि आता तुम्ही माझं मुकाट ऐका' असला आविर्भाव त्यांच्याठायी कणभरही जाणवत नाही.

त्यांचा असा कुठलाही ध्यानविधी वगैरे नाही. त्यांच्या एकूण शिकवणुकीचा गाभा म्हटला तर 'सेल्फ एन्क्वायरी' किंवा 'आत्म-विचारणा' हा आहे. म्हणजे मनाला सतत प्रश्न विचारा. धांडोळा घ्या. प्रश्न, त्यामागे आणखी एक प्रश्न, त्यापाठीमागे पुन्हा आणखी एक प्रश्न असं करत करत मागे मागे इन्फिनिटी पर्यंत.! या प्रक्रियेत मन संभ्रमात पडतं. अवचित गळून पडतं. विलीन होतं.

हे म्हणजे मनाचा वापर करून मनाला निर्विचार करणं.‌ मनाचा वापर करून मनाचा अंत घडवून आणणं. आणि हे सगळं तर्काच्या आधारे.! कुठंही 'हे माना' 'ते माना' 'यावर विश्वास ठेवा', 'त्यावर श्रद्धा ठेवा', 'अमुक शास्त्र असं असं सांगतं', 'तमुक ज्ञानी असं असं म्हणतो' वगैरे काही नाही. किंवा उगीच उदाहरणं/कथा-किस्से सांगून पाल्हाळ लावणं नाही. ते थेट मुद्द्यालाच हात घालतात आणि शेवटपर्यंत धरून ठेवतात. तर असा हा शुद्ध ज्ञानमार्ग. स्वतःच स्वतःला विचारून बघा आणि जाणा. 



[रमण महर्षींसंबंधी थोडी अधिकची माहिती :

देहावसान (१९५०) होईपर्यंत ते तमिळनाडूमधील अरूणाचल पर्वत परिसरात राहत होते. ते स्थळ रमणाश्रम म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची राहणी अतिशय साधी सहज होती. आणि चेहऱ्यावर निर्मळ हासू. चांगलेपणाची बरसात करणारं.!

आयुष्यभर सर्ववेळ ते तिथे आश्रमात एका हॉलमध्ये बसून राहत. देशविदेशातून अध्यात्मिक जिज्ञासूंचा ओघ चालू असे. कुणीही यावं, बसावं. बोलायचं असेल तर बोलावं, काही विचारायचं असेल तर विचारावं. बोलायचं नसेल तर मौन बसावं. त्यांच्यापुढं सगळ्यांना मुक्त प्रवेश असे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांना ॲक्सेसिबल राहिले. सगळ्यांशी सारख्याच आत्मीयतेने बोलत राहिले.‌ व्हीआयपी/ सर्वसामान्य/गरीब/पैसेवाला/ प्रापंचिक/ साधक/ लहान मुलं/ जात-धर्म असला काही भेदभाव नाही. त्यांनी आजकालच्या काहीजणांसारखा स्पिरीच्युॲलिटीचा बाजार केला नाही. कर्मकांड, धार्मिक अवडंबर, चमकोगिरी, हारतुरे, बुवाबाजी, चमत्कार वगैरे काही नाही. ]

'सिंधुतील साम्राज्ये'- पुस्तक परिचय

सिंधू नदीची एक अद्भुत बायोग्राफी असं या पुस्तकाचं वर्णन करता येईल. सिंधुकाठी बहरलेल्या अनेकानेक लोकसंस्कृत्यांचा मनोज्ञ धांडोळा या पुस्तकात ...