Wednesday 10 April 2024

साधी गोष्ट

 स्वारगेटला उतरलो. बस स्टॅंडवर उद्घोषणा. प्रवाशांनी आपलं सामान कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात देऊ नये. अश्लील आहे हे.

पण तसं बघायला गेलं तर, आधी केले मग सांगितले, हेपण अश्लील आहे. एकेकाचा नजरीया म्हणायचं. दुसरं काय?

जेण्ट्स वॉशरूम. नेहमीचं गर्दीचं दृश्य. सगळे एका लाईनीत उभं राहून चेहरा शक्य तेवढा गंभीर ठेऊन कार्यक्रम उरकत असतात. मागं कुणीतरी वाट बघत उभं असेल तर त्या अदृश्य दडपणामुळं मला प्रॉब्लेम होतो. त्यात समोरच्या भिंतीवर मुंग्यांची रांग. त्यात एक मुंगी आजारी वाटतेय. बाकीच्या मुंग्या तिच्यापाशी थांबून विचारपूस करून जातायत. मी त्यात गुंग. क्षणभर आपण इथं कशाला उभं राहिलोय तेच विसरलो.

स्टँडमधून बाहेर.
मुटकुळं करून बसलेली कुत्री. नाराज दिसतायत. भुंकण्यावर निर्बंध आहेत. चॅनेलवाल्यांचे माईक काढून ह्यांना दिले तर वस्तूचा काही उपयोग तरी होईल. सरकारनं कायतरी केलं पायजेल.
'भैय्या, आपके पास गुगल पे है क्या ?'
एक टकाटक पोरगं एका भिकाऱ्याला विचारतंय. त्याच्याकडे सुट्टे पैसे नाहीयेत, जे आता नष्टच झाले. परिणामी दानधर्माचं पुण्य घेण्यामध्ये गॅप निर्माण झालाय. सरकारनं कायतरी केलं पायजेल.

कात्रज वरून खचाखच भरलेली एक बस आली आणि कण्हत कण्हत स्टॉपवर थांबली.
मागनं पाच मिन्टात आजून एक बस येनाराय आनी ती आख्खी रिकामीच असनाराय, असं कायतरी कंडक्टर ओरडतोय. पण हे नेहमीचंच आमिष आहे. कोण विश्वास ठेवणार ? सगळे तातडीनं घुसायला बघतात. मी पण.
आई बाप आणि पोरगं दिसलं की हे कार्टं आई-बापापैकी कुणावर गेलंय, ह्याचा अंदाज बांधत बसायची सवय आहे. वेळ बरा जातो. दापोडीला बसायला जागा मिळाली. तेवढ्यात एकाने, जरा सरका ओ, म्हणत माझ्या डोळ्यांपुढून खिडकीतून बाहेर एक जोरदार पिंक टाकली. आता ती समजा खाली कुणाच्या अंगावर पडली असती, आणि तो आळ माझ्यावरच आला असता, तर मी त्या प्रसंगाला कसा समोरा गेलो असतो, इत्यादी स्वरूपाच्या मध्यमवर्गीय भीतीनं काळीज पाचेक मिनिटं धडधडत राहिलं.

रूमवर पोहचतो. मित्र फोनवर आहे. आवाज वाढलेला आहे. त्याच्या कुठल्यातरी प्रेयसीचा भाऊ त्याला मारायला येणाराय, असं संभाषणातून कळतं. आता आपल्याला मध्यस्थी करावी लागतेय की काय? माझी धडधड. ह्याला कितीवेळा सांगितलं. प्रेमं वगैरे करायला एका विशिष्ट समाजातल्या मुली बऱ्या असतात. जरा पोस्टमॉडर्निश वातावरण असतंय त्येंच्यात. सहसा हाणामारीची वेळ येत नाय. पण ऐकतो कोण ? भोगा आता.
रात्रभर मुबारक बेगमचं 'कभी तनहाईयों में हमारी याद आयेगी' ऐकत ऐकत झोपलो. पहाटे तिला एक 'गुड मॉर्निंग'चा निरुपद्रवी मेसेज केला.
तर ‘रात्रभर झोप नाही. गुड मॉर्निंग कशी म्हणू?’ हा रिप्लाय. स्वप्न तुटलं. आजारी पडल्यासारखं वाटलं.

आजारी. खरोखरच. जाम अंगदुखी. वीकनेस. नेहमीचं क्लीनिक.
नर्स: हा घ्या. थर्मामीटर लावून बघा.
मी : ताप नाहीये पण मला.
नर्स: असू द्या. लावा. पद्धत है तशी.
नर्स: आनी तब्बेत लै बारीक झाली. काय खात नाय का?
मी: काय आता, शरीर म्हटल्यावर चालायचंच.
नर्स: अवो,ते म्हाताऱ्या माणसाचं झालं. तुम्ही जवान हाईत की अजून.
ह्याच्यावर कायतरी फिलॉसॉफीकल बोलायचं होतं, पण ऐनवेळी आठवलं नाही. वय जाणवायला लागलं वो आता.

बहुतेक त्यापुढच्या सकाळी एफसी रोडवरच्या त्या प्रसिद्ध कॅफेपुढे तिची वाट बघत मी उभा. एक शासकीय कार थांबते. काळा गॉगल लावलेला एक साहेब त्यातून उतरतो. आता तो खिशातून पिस्तूल काढून मला गोळी घालेल का? नाही. तसं काही होत नाही. साहेब डोसा खायला आत. ड्रायव्हर कम हवालदार राहील बाहेरच वाट बघत उभा. ती येते. आम्ही आत जातो. डोसा यायला उशीर आहे. बसून बसून काय करायचं. जीवन वगैरेसंबंधी हायफाय चर्चा करण्यासाठी हा कॅफे आहे.
'काय बघतोयस?' ती
'तिकडच्या कोपऱ्यातली आंटी मस्त आहे', मी डोश्याचा तुकडा उचलत, सूर सहज ठेवत म्हणतो.
'मग मी इथं कशासाठी आहे?' तिच्या आवाजात आश्चर्य.
'तू काही नेहमीच असत नाहीस, असणार नाहीस.' मी.
'तुला काय पाहिजे नक्की?' ती गढूळ डोळ्यांनी विचारते.
'तू पाहिजेस. हवी तेव्हा. हवी तेवढी.' मी.
'तू आता परत तेच सुरू नकोस करू बरं का.' हे बोलत असताना ती तिची पावलं टेबलखालून माझ्या पावलांवर फिरवत राहते. थंड अंगठयानं पावलांवर वर्तुळं वर्तुळं काढत राहते.
'काय होतंय?' मी
'कुठे काय?' पायगुंता तसाच चालू ठेवत ती विचारते.
'हे असं टेबलखालून फ्लर्ट करणं अलाऊड आहे वाटतं इथं?' मी स्वतःची सळसळ उघडकीस येऊ न देता विचारतो.
'मला सगळं अलाऊड आहे.' ती तिच्या बोटांनी माझी बोटं पकडून ठेवण्याचा प्रयत्न करत म्हणते.
‘चल. आपण बाहेर चालत चालत बोलू. समोरासमोर बसून बोलण्याची मला सवय नाही. जुना प्रॉब्लेम आहे.’ मी.
बाहेरच्या हवालदारानं आता मोबाईलमध्ये डोकं घातलेलं असतं. वेळ घालवण्यासाठी तोच एक पर्याय असतो.

बहुतेक त्यानंतरच्या की कुठल्याशा सकाळी मी तिला विचारलेलं, ‘आपण काही काळ एकत्र रहायचं का?’
‘का रे? लिपस्टिकची चव आवडली की काय?’ त्यावर हा रिप्लाय.

भूतकाळातल्या गोष्टी वर्तमानात बघताना त्याकडे कसं बघायचं याचं स्वातंत्र्य असतंच. ते स्वातंत्र्य वापरलं पाहिजे. तेव्हा माहित नसतं की पुढे असं असं होणाराय. तर झालं ते चांगलंच झालं, असं समजून लिहायला काय हरकत आहे?
लॅपटॉप बंद करतो. उठतो. ब्लेंडर्स प्राईड आणि पाणी ग्लासात ओतून ओळखीचं मिश्रण बनवतो. एक गल्प मारतो. बरं वाटतं. बरं वाटत असताना कोण लिहिणार? लिहून बरं वाटत असेल तर वेगळं. बाकी, कथांमध्ये अशी प्रेमप्रकरणं जुळवून स्वतःचे प्रॉब्लेम्स सुटत नसतात, ही साधी गोष्ट लेखकाला कधीतरी कळेल अशी आशा आहे.

Tuesday 9 April 2024

काही वाचननोंदी

 १. आधी माझ्याकडे पेंडींग पुस्तकं नसायची. लायब्ररीतून आणायचो, वाचून झाली की परत दुसरी आणायचो.‌ पण मग हळूहळू हावरटासारखा स्टॉक करायच्या मागं लागलो. दिसलं, चांगलं वाटलं की आणायचं. वाट बघायला नको, हक्काचं आपल्याजवळ असलं की हवं तेव्हा वाचू शकतो, हे समर्थन.‌

अशी काही पुस्तकं दरवेळी खरेदी करून आणून ठेवायची. त्यावर नाव-तारीख टाकायची.‌ मग जरा निवांत बसून ती सगळी चाळून बघायची. त्यातलं जे पुस्तक पटकन स्वतःत ओढून घेतं, ते चालू करायचं. बाकीची तशीच निम्मी अर्धी वाचून टेबलवर पडून राहतात, उरलेला भाग जरा नंतर वाचता येतील म्हणून. पण तेवढ्यात आणखी पुढचा स्टॉक येतो. किंवा मधल्या काळात कुणीतरी नवीन लेखक/ लेखिका सापडलेली असते. मग त्यातलीही दोन-तीनच आरपार संपतात.‌ बाकी तशीच.

काही पुस्तकं तर 'नंतर वाचू नंतर वाचू' म्हणत त्या ढिगाऱ्याच्या अगदी तळाशी गेलेली असतात. मग जरा सहा महिन्यांतून एकदा बसून त्यातल्या काही पुस्तकांना टाटा बाय बाय करतो.
मध्यंतरी मी विचारसरणीच्या अंगानं काही पुस्तकं/ कादंबऱ्या वाचत होतो.‌ तर मग तशा पुस्तकांचा खूप स्टॉक होत गेला. मग एकाच विचारसरणीच्या अंगाचं सलग वाचत राहिलं की सगळ्या जगाकडे आपण त्याच दृष्टीकोनातून बघायला लागतो. त्यात काही लिखाण तर एवढं मॅनिप्युलेटीव्ह असतं की सगळं भयावह वाटायला लागतं. डोकं तापतं. कालांतराने बघितलं की कळतं ते काय फार ग्रेट नव्हतं.
मग अशी काही पुस्तकं वर्षभरानंतर नको वाटायला लागलेली असतात.‌ कारण आपणही मधल्या काळात बदललेलो असतो. तर मग त्याही पुस्तकांना निरोप.
आता काही दिवस कायतरी लाईट लाईट वाचायला पायजे.
वैचारिक संघर्ष असलेलं काही वाचायला नको. आपण ट्रिगर होतो. कुठल्याही समाजात वैचारिक लोकं नेहमीच अल्पसंख्याक असणार. एका बाजूला झोंबी, तर दुसऱ्या बाजूला फ्रस्ट्रेटेड. दोहोंच्या मध्ये अथांग पसरलेला मिडलक्लास क्राऊड. त्या बल्क पब्लिकला आपापल्या बाजूनं खेचायची चढाओढ चाललेली. ह्या भांडणात आपण कुदायचं कारण नाही.

. शिवाय वर्षानुवर्षांचा ऑलरेडी सेटल झालेला स्टॉक असतो, त्यातल्या पुन्हा वाचावंसं वाटणार नाही, अशा काही पुस्तकांना निरोप. त्यासाठी निकष एकच, ज्या पुस्तकांत पूर्वी आपण भरपूर भरपूर खुणा करून ठेवलेल्या असतात, ती ठेवायची. ज्यात त्या मानाने कमी खुणा केलेल्या असतात ती काढून टाकायची.

आणून ठेवलेली पुस्तकं आणि त्यातली वाचून संपवलेली पुस्तकं, यातलं प्रमाण गंडत चाललेलं आहे. म्हणजे हावऱ्यासारखी उचलून आणायची पुस्तकं आणि पुन्हा ती विसरून तिसरंच काहीतरी वाचत बसायचं. पुन्हा काही नवीन दिसली की आणायची आणि आधीची विसरून ती वाचत बसायचं. अशानं सगळं गणित बिघडतं. थोडीतरी शिस्त पाहिजेच.

. अलीकडे हिंदीमध्ये मिथिलेश प्रियदर्शीचं 'लोहे का बक्सा और बंदुक', शशिभूषण द्विवेदीचं 'कहीं कुछ नहीं'', अविनाश मिश्र यांचं 'नये शेखर की जीवनी', चंदन पांडेय यांचं 'वैधानिक गल्प', पुरूषोत्तम अग्रवाल यांचं 'नाकोहस';
तसंच मराठीमध्ये मृद्गंधा दिक्षित यांचं 'करुणापटो', संग्राम गायकवाड यांचं 'मनसमझावन' अशी काही पुस्तके आली आहेत. ह्या लेखकांनी आपापल्या पुस्तकांत वैचारिक लाईन मांडण्यासाठी जे प्रयोग केले आहेत, ज्या अफलातून स्ट्रटेजी वापरल्या आहेत, त्यामुळे ही पुस्तकं अतिशय सरस वाटली.
वैचारिक कादंबऱ्या लिहिताना लेखकांनी मन थोडं विशाल केलं पाहिजे, विरूद्ध विचारालापण स्थान दिलं पाहिजे. कारण ते एक उमद्या लेखकाचं लक्षण आहे.‌
पण सध्याच्या काळात ती फक्त आशाच आहे. कारण शीर्षकंच एवढी भडक असतात, टारगेटेड वाचकांसाठी असतात, अंतिम सत्य गवसल्याच्या घोषणेसारखी असतात की आत काय आनंदीआनंद असणाराय हे कळतंच म्हणजे.‌ (उदाहरणार्थ हे शीर्षक कसं वाटतंय बघा : 'जगाला पोखरणारी डावी वाळवी')

. ऐश्वर्या रेवडकर यांची 'विहिरीची मुलगी' वाचली.
फाफटपसारा फार आहे. 'सांगणं' खूप आहे, आणि 'दाखवणं' कमी. वानगीदाखल सांगायचं झालं तर ही एक ओळ- 'आम्ही खूप वैचारिक वाद घातला'
तर त्या पात्रांनी जो वैचारिक वाद घातलेला आहे तो सरळ तिथं लिहायला पाहिजे होता. 'वाद घातला' हे सांगणं झालं. तो वाद तिथं लिहिणं हे 'दाखवणं' झालं.

सांगायला लागली की सांगतच राहते. थांबतच नाही. तेच तेच पुन्हा पुन्हा सांगते. कादंबरीचा कच्चा आराखडा एखाद्या चांगल्या जाणकाराच्या नजरेखालून गेला असता, तर ह्यातला तीसेक टक्के मजकूर परस्पर वगळला गेला असता.

सध्या विशीत असणाऱ्या दोन मैत्रिणी ज्या भाषेत संवाद साधतात, ती भाषा लेखिकेनं ऐकलेली नसावी की काय अशी शंका येते. फडके-खांडेकरांच्या काळातली आणि दवणे-वपुंच्या काळात वाचकांनी नाईलाजाने गोड मानून घेतलेली पुस्तकी भाषा, २०२४ साली पुन्हा पुस्तकात आणण्याचं प्रयोजन समजलं नाही.‌ शब्दांच्या फुलोऱ्याचा सोस खूप. जे एका ओळीत सांगून विषय मिटवता आला असता तिथं दीड पान खर्च झालंय.
बाकी मग 'प्रेम हे असं असतं न् आयुष्य हे तसं असतं', 'डोळे डबडबणे', 'अत्यानंद होणे', 'कळी खुलणे', 'सुस्कारा सोडणे' वगैरे सगळं आहेच म्हणजे. आणि कळी तरी किती वेळा खुलणार ना म्हणजे?

ह्यात जे मीरा नावाचं मुख्य पात्र आहे तिचे प्रियकर, मित्र, मैत्रिणी भुईवर घट्ट उभेच राहत नाहीत. पात्रांचं जरा आणखी डिटेलिंग पायजे होतं. काही प्रसंग कृत्रिम, फिल्मी वाटतात. शिवाय यातले आईबापही बडबड फार करतात. आया तर पत्रं पाठवून बडबड करतात. आत्मशोधाच्या नावाखाली ब्लॉग मधले काही पॅराग्राफ येतात अध्ये मध्ये. अस्थानी वाटले. त्यातून कसलाही अर्थ लागला नाही. आणि कसलाही भाव मनात उमटला नाही.
कुणी म्हणेल अशी नकारात्मक शेरेबाजी करणं योग्य नाही.‌
अहो, मग तसं लिहू नका ना.

लेखिका स्वतः चांगल्या ॲकॅडमिक बॅकग्राऊंडची डॉक्टरीण आहे. चांगलं सामाजिक काम आहे त्यांचं‌. त्याबद्दल आदर आहे. परंतु ह्यात लिहिताना स्वतःतील डॉक्टरीणीचा प्रभाव जरा जास्तच पडलेलाय. स्त्रियांच्या लैंगिक, मानसिक किंवा आरोग्यविषयक वैद्यकीय माहिती/प्रबोधन/काऊन्सेलिंग हे सगळं पात्रांच्या तोंडून 'डंप' केलेलंय. ती माहिती चांगलीय. पण हे कादंबरीत लिहिण्याऐवजी पेपरमध्ये लेखमालिका लिहिली असती तर जास्त स्त्रियांपर्यंत ती माहिती पोचली असती.‌ समस्त स्त्रीजातीला शहाणं/सावध करून सोडणं, हा काय कादंबरीचा उद्देश असू नाही.
यावर कुणी म्हणेल, 'छे छे तुला बायकांचं मन कळत नाही.‌'
बरोबर आहे. नाही कळत. पण कळून घ्यायचं कुतुहल आहे म्हणून तर वाचतो ना.‌ तर तुम्हीही ते सांगा जे मला माहिती नाहीये. आणि भाषा जरा 'आज वाचणाऱ्यांना' रिलेट होईलशी वापरा प्लीज. सॉरी. हे सगळं जरा जास्तच हार्श झालं बहुतेक. एवढीही काही खराब नसेल कादंबरी. वाचताना मूड चांगला नसला की हे असं होत असावं.!

. निर्मल वर्मा निःसंशय थोर लेखक आहेत.
वे दिन. अंतिम अरण्य. एक चिथडा सुख. काला कौआ और पानी.‌

मला जे वाटतं ते त्यांना आधीच वाटून गेलेलं आहे. आणि ते शांतपणे लिहिलंय, जसं लिहायला पाहिजे. आक्रस्ताळेपणा नाही. आग्रह नाही.‌ आव नाही. राग नाही. चीडचीड नाही. जसा आहे तसा स्वतःचा स्वीकार.‌ एकटेपणा.‌ फार तर दुकटेपणा.‌ तोही मिश्किल. विचारसरणी नाही.‌ पूर्वग्रह नाही. देश नाही. देशभक्ती नाही. घर नाही. संस्कृती नाही.‌ निरा मोकळा सडा माणूस.
माणसानं माणसासाठी लिहावं. निरर्थकतेची चित्रं लिहावी. आणि हे कुठंतरी विदेशात घडलेलंय.‌ पन्नास वर्षांपूर्वी.
तर पुढच्या पिढीतल्या वाचणाऱ्यासाठी लिहावं. त्यांना सांगावं आज आत्ता इथं माझं काय होत होतं. जगण्याचा एवढा किस कसा काय काढलाय ह्यांनी.‌ निवांत सवड कशी मिळाली ? कोण कुठला हा लेखक. माझ्या वाट्याचा विचार तोच करून मोकळा झालाय. त्याचे विचार मला आज लागू पडतायत. आवडतायत. भिडतायत. म्हणजे ह्या सगळ्यातून तोपण गेलेला असणार.

प्राग, व्हिएन्ना, लंडन, बुडापेस्ट, सिमला.. लोक‌ युरोपातले महिनोन्महिने फिरत राहतात. आर्ट गॅलरी, चर्च, कलांचा आस्वाद, फिल्म्स पेंटींग संगीत दारू पब्ज वगैरे.‌ इथं साला जॉब सत्तर टक्के आयुष्य शोषून घेतो‌. मान वर काढायला फुरसत देत नाही. एकाच काळात किती वेगवगळी जगं असतात.
वाचताना एखादं चांगलं वाक्य डोळ्यांपुढे आलं की लगेच ते जगजाहीर करावंसं वाटणं, सगळ्यांना सांगावं वाटणं, हा बालिशपणा आहे. आपण आता तो बंद करायला पाहिजे.
त्यापेक्षा एक चॅप्टर वाचून पानांत बोट ठेवून पुस्तक छातीवर ठेवावं. वाचलेलं मुरू द्यावं. घोळवावं. हे बरंय.

. ओरहान पामुक या इस्तंबूल च्या लेखकाची 'दि रेड हेअर्ड वुमन'. धुक्यातनं वाट काढत जाणारी कादंबरी. हुकुमशाही तिकडेही आहेच.
हंकन गुंदे ची 'एक होता गाझा'. मानवी तस्करी बद्दल.
मनाची युद्धभूमी झालेलीय. एकाच काळात सात ते आठ जागतिक दर्जाचे लेखक/लेखिका तुर्कस्तानात अस्तित्वात आहेत. तुर्की वाचकांची चैन आहे.

. मनस्वीनी लता रवींद्र आणि शिल्पा कांबळे या दोघींच्या 'मुक्त शब्द' मधल्या कथा वाचल्या. ह्यातल्या स्त्री नायिका धर्मांध दाखवल्यात. ही स्ट्रॅटेजी दिसतेय. मुद्दाम वाकड्यात शिरून सगळं डार्क करून दाखवायचं. आणि वाचणाऱ्याला लाज आणायची. इलाज नाही. या वातावरणात डायरेक्ट ॲटॅक करून काय उपयोगाचं नाही. लिहायचं तर अशाच कायतरी नवीन वाटा शोधल्या पाहिजेत.

मानव कौलची 'तितली'. मृत्यूवर कसलं भारी लिहिलंय ह्यानं. रात्री दीड-दोन वाजता सगळी सामसूम असते, तेव्हा वाचायला हे काढून ठेवलं पाहिजे.
मानव कौलचा 'ठिक तुम्हारे पीछे' हा त्याचा सगळ्यात चांगला कथासंग्रह. तो आवडला म्हणून इतर काही पुस्तकं आणली. आणि ती तीन वेगवेगळ्या महिन्यात दिवसाच्या वेगवेगळ्या वेळी वाचायचा प्रयत्न करून बघितला. आणि शेवटी एवढी काही खास नाहीत असा निष्कर्ष काढला.‌

डॉ. जयसिंगराव पवारांनी संपादित केलेला 'राजर्षी शाहू : पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ'. हे फार मोठं काम आहे. राजर्षींबद्दल जे काही संदर्भ पाहिजे असतील ते सगळे एका जागी मिळतात. तात्कालीन पत्रं, दुर्मिळ फोटोग्राफ्स, कागदपत्रं, वर्तमानपत्रांतली कात्रणं, दरबारचे आदेश, भाषणं, अहवाल, आठवणी, सगळ्या लेखांचं संकलन. सगळं सणसणीत काम आहे म्हणजे. लोकराजा च्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाला शोभेल असं. आवडलं आपल्याला.

. ग्यान चतुर्वेदी लहान मुलासारखं निर्मळ, प्रांजळ हसतात.‌ ह्या वयात एवढा आनंदी कसा काय राहू शकतो हा माणूस?
काशीनाथ सिंह यांचं 'याद हो कि न याद हो' हे संस्मरण. समकालीन लेखक, कवींबद्दल अतिशय हृद्य लिखाण आहे. मराठीत 'असं' चांगलं संस्मरण अजूनतरी वाचनात आलं नाही.

आशुतोष भारद्वाजचं 'मृत्यूकथा: नक्षली भूमीतील स्वप्ने आणि भ्रम'.
नक्षलवादावरचं आजवर वाचलेलं सगळ्यात उत्तम पुस्तक.‌
उत्तुंग लेखनप्रतिभेची झलक. सर्जनशील कादंबरी प्लस वेगवान रिपोर्ताज, असं कॉम्बिनेशन. गुंतवून ठेवणारं, भयाण अस्वस्थ करणारं.‌ एका इश्यूचे एवढे विविध पैलू. तेही कुणाचीही बाजू न घेता. ग्रेट.
शिवाय, ह्या लेखकामुळं हिंदीतला कृष्ण बलदेव वैद हा आणखी एक टोलेजंग लेखक माहिती झाला. सध्या त्याचं फक्त 'माया लोक' मिळवलंय. तर हा एक लेखक संपूर्ण मिळवून वाचावा लागेलसं दिसतंय.

भकास तारूण्याबद्दलची पुस्तकं खूप येत आहेत. प्रदीप कोकरेचं 'खोल खोल दुष्काळ डोळे' हे एक. शिव्या खूप आहेत. अप्रासंगिक वाटतात. आणि नुसत्या शिव्या लिहून काय होतं? हे असलं तर माझ्यासारखेपण लिहू शकतात. बाकी, ह्यातली नेमाडे आणि तुकारामांबद्दलची निरीक्षणं आवडली.

गवसलेलं पान

साल अमुक अमुक. महिना तमुक तमुक. स्थळ पुणेच.‌ आणि शक्यता बहुतेक कॅन्सरची. एक महिना वाट बघितली. पण एक विशिष्ट लक्षण कमी होत नव्हतं. वाटलं, एवढ्यातच आपलं वरचं तिकीट कन्फर्म झालं की काय?

मग येतं वागण्या-बोलण्यात विलक्षण परिवर्तन. एरव्ही आपण कितीही आव आणत असलो तरी मृत्यूची भीती ही सगळ्यात प्रायमल भीती. ती खतरनाक ट्रान्सफॉर्म करते माणसाला. भलेभले गळाठतात, आपण काय चीज?
महिनाभर इंटरनेटवर शोधाशोध करण्यात, मनाची समजूत काढण्यात वेळ काढला.
आवराआवर निरवानिरव कशी करायची ह्याचे अतिरंजित आडाखे बॅकमाईंडला. ते तसेही काही सुचू देत नसतात. शिवाय वरवर सगळं नॉर्मल आहेसं दाखवणं भाग.

मग म्हटलं की असं टांगलेल्या मनस्थितीत राहण्यात काही अर्थ नाही. जे काही आहे ते कन्फर्म करू.
एका डॉक्टरला गाठलं. बोललो की अशी अशी पार्श्वभूमी आहे, अशी अशी स्थिती आहे, असं असं असेलसं वाटतं. ते खुर्चीतल्या खुर्चीत जरा सावरून बसले. मग थोडंफार चेकअप करताना त्यांनी काही प्रश्न विचारले. जमेल तशी उत्तरं दिली. एका अर्थी पापांची कबूलीच म्हणजे.
मग ते बोलले, तुम्ही थोडा वेळ बाहेर बसा.
आणि आत त्यांची फोनाफोनी चालू असलेली काचेतून दिसते.‌ आवाज हळू आहे. मला इकडे हवाय तात्काळ दिलासा. आणि ही वातावरण-निर्मिती मला अजिबात दिलासा मिळू देत नाहीये.‌

दुसऱ्या दिवशी त्या डॉक्टरसोबत पौड रोडला दुसऱ्या एका डॉक्टरच्या हॉस्पिटलमध्ये. तिथं काही टेस्ट. दोन दिवसांनी अमुक लॅबमधून रिपोर्ट मिळतील, कलेक्ट करा, असा नंतर फोनवर निरोप.

त्या दोन रात्री टक्क जागा. भयाचं सावट पूर्ण अलूफ मोडमध्ये नेतं माणसाला. जग भकास. त्यात एक मिटलेपण. रंगीबेरंगी, चहलपहल, दिलदुनिया काहीही दिसायचं बंद.

दोन दिवसांनी त्या डॉक्टरच्या लॅबमध्ये वेळेआधीच. रिसेप्शनिस्ट बोलली की पेशंट कुठाय? मी बोललो मीच पेशंट. तिच्या नजरेत कुतुहल, सहानुभूती.

डॉक्टरनी आत बोलावलं. रिपोर्टचा लखोटा हातात दिला.
बोलले, "तुमचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. पण तुम्ही हे सिगारेट वगैरे बंद करा बरं का..! एकदम बंद करा..!"

थरथरत्या हातांनी रिपोर्ट उघडला. वाचला.‌ पुन्हा पुन्हा वाचला. नो मॅलिग्नन्सी डिटेक्टेड. सगळं पूर्ववत करणारे तीन शब्द.
काळजात एक ससा उंच उंच उड्या मारतो. आणि जीवनदायी उर्जेचा प्रवाह शरीरभर..!
खुर्चीतून उठायला लागलो तर डॉक्टर बोलले की थांबा, तोंड गोड करून जा. त्यांच्या चेहऱ्यावर एखाद्या झेन तत्वज्ञान्यासारखं हसू‌. ते बघूनच माणूस निम्मा बरा होत असावा.
मी सवयीनं बोललो की नाही, नाही, नको.
ते बोलले, "अहो घ्या. माझीपण चहाची वेळ झालीच आहे.‌ बसा."
चेहऱ्यावर तेच निर्मळ हसू.
टोटली अनोळखी व्यक्तीकडून एवढी ग्रेसफुल ट्रिटमेंट मिळाल्यावर आपल्याला उगाच सेंटी व्हायला होतं. आपण आता जरा पोक्तपणे वागायला शिकलं पाहिजे.‌

चहा पिलो. जिन्याच्या शेवटच्या पायरीवरून उडी मारून बाहेर पडलो. तर रस्त्यावर डिसेंबरातल्या दुपारचं स्वच्छ फ्रेश ऊन. सगळं एकदम शुभ्र शुभ्र. मघाच्या काजळीचा लवलेशही शिल्लक नाही.‌
हे कुठलंतरी वेगळंच जग आहेसं वाटतंय. किंवा जग तेच आहे आणि आपण बदललोय, असंही असेल. असंच आहे ते.‌.!
साला कुणी कितीही काहीही म्हटलं तरी जग चांगलंच आहे राव..! हे लिहून फ्रेम करून ठेव.

मग त्या रात्री झोपण्यापूर्वी हेडफोनमधून एक प्रार्थना, सलगच्या सलग, कितीतरी कितीतरी वेळा :
जग जीवन, जनन मरण, हे तुझेच रूप सदय..
सृजन तूच, तूच विलय, दे प्रकाश देई अभय..
गगन सदन तेजोमय..

कराड आणि मी


(सदर लिखाण पूर्णतः काल्पनिक असून, कोणत्याही व्यक्ती अथवा स्थळाशी साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा. )


१.

कधीतरी बऱ्याच वर्षांनी पुण्याहून कोल्हापूरकडे चाललेलो असतो. कोयनेचा पूल ओलांडला की हायवेशेजारचं पंकज हॉटेल दिसतं. आणि प्रॉब्लेम होतो. भावना उचंबळून यायचा धोका निर्माण होतो. हे असं दरवेळी होतं. दरवेळी नव्यानं होतं.


चौदा वर्षं झाली ग्रॅज्युएशन होऊन. तेवढीच वर्षं हे शहर सोडून झाली. अजूनही या शहराशी असलेला बंध तुटत नाही. एक विलक्षण गुरूत्वाकर्षण जाणवतं कराडच्या आसमंतात आल्यावर..! आता हे जरासं पोएटिक झालं, हे मला मान्य आहे. मलाही अशी सुरुवात करायची नव्हती. पण आता तशी झालीय खरी.


परंतु यापुढे असं लिहून तुम्हाला बोअर न करण्याचं आश्वासन देतो. ज्याला कराडातले लोक प्रेमाने फक्त 'घाट' म्हणतात आणि कराडबाहेरचे लोक ज्याला प्रीतीसंगम म्हणून संबोधतात, तिथल्या टपऱ्यांवर कधीकाळी ओढलेल्या हजारो सिगरेटींची शपथ घेऊन तसं आश्वासन देतो, अध्यक्ष महोदय.


कट टू :

"लेफ्ट साईड ऑफ दि रोड. आणि थर्टी किलोमीटर्स पर अवरचा स्पीड. हे दोन रूल्स कायम लक्षात ठिवायचे बग. चल आता निवांत. काय घाई नाय आपल्याला."

मागचा माझ्या कानात सल्ला देत होता. आम्ही दोघंही टाकूनच होतो.


त्याकाळी माझ्या बाईकला मागं एखाद्या मुलीनं बसण्याची सवय नव्हती. माझ्या बाईकला फक्त बेवड्यांची सवय होती. कॉलेजचा अभ्यास सांभाळत मी युपीएससी सुद्धा करत आहे, वगैरे अफवांमुळे हुरळून जाऊन आईनं सदर बाईक मला घेऊन दिलेली. आया पोरांच्या बाबतीत भाबड्या असतात. आणि त्यांच्या भाबडेपणात दिवसेंदिवस वाढच होत जाते. आणि ही एक चांगली गोष्ट आहे, असं मला वाटतं.


तर हायवे वरच्या एका गुप्त अड्ड्यावर बसून झाल्यावर 'संगम'ला सादा फुलचंद पान खाऊन डुलत डुलत होस्टेलपर्यंत जाणं, हा सवयीचा भाग होता. तसं व्रतच घेतलेलं. डोळसपणे घेतलेलं.


परंतु कमिशनर, एसपी वगैरे नवीन आल्यावर प्रोटोकॉल प्रमाणे जशा धाडी माराव्या लागतात, तशीच धाड एकदा त्या गुप्त अड्ड्यावर पोलिसांनी मारली. सगळ्यांची पांगापांग झाली. बिलपण न भरता सगळे पळाले. तर्राट उधळले सगळे घोडे.


एक जोडीदार शेतातून पळता पळता विहिरीत उतरला. आणि तिथेच लपून मला मिस्ड कॉल मारत राहिला. आता हा बाबा विहिरीतनं मिस कॉल मारतोय, हे ऊसात लपून बसलेल्या मला माहिती असण्याचं काहीच कारण नव्हतं. आणि जसा त्यावेळी कुणाकडेच नसायचा तसा माझ्याकडेही बॅलन्स नव्हता. मी त्याला नोकियाच्या डबड्यातून एसओएस चे फ्री मेसेज पाठवत राहिलो.

त्याला पोहता येत नव्हतं. परंतु विहीर कोरडी होती सुदैवानं. त्यामुळे विहिरीत लपून बसलेला हा मनुष्य नंतर डीवायएसपी होऊन बसला. हा एकदम पोएटिक जस्टीस झाला म्हणजे. तर तोपण आता अशाच धाडी वगैरे मारत असेल का? विचारायला पायजे एकदा बसल्यावर.


बाकी, त्या गुप्त अड्ड्याचा मालक दुसरे दिवशी फुकट्यांना शोधत कॉलेजवर फिरत होता, असं समजलं. कॉलेजवर त्याला कोण सापडणार? आम्ही काय कॉलेजला जाणाऱ्यांपैकी वाटलो की काय त्याला? ओळखपरेड फुकट गेली. हरकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. एकदा जाऊन त्याचं बिल चुकतं करून टाकायला पायजे.

---------------+++++-----------++++++++-----

----------------+++++----------++++++++------

२.

कट टू:-

होस्टेल ब्लॉक सी मधलं बाथरूम. प्रत्येक दहा रूम्ससाठी पाच बाथरूम्स. त्यातलं फक्त एक वापरायच्या कंडिशनमध्ये. कारण इमारत १९६० सालची.


'आरं आटप की लवकर. तू काय आत हस्तमैथुन वगैरे करायलैस की काय?'- मी.


''व्हय. ये, तुला बी देतो माजा शांपू. एकदम फ्रेशे बग."- तो.


''लाव तूच ल*ड्या. पाऊचमदी भरून इकायला चालू कर आता.''- मी.


मध्यंतरी उघडाबंब मी व्हरांड्यात येरझाऱ्या घालताना दिसतो. हे दुष्काळी काय बाहेर येत नाय आज. गानी म्हनत बसलंय आत. दूरी सही जाए ना. आतिफ आस्लम चावलंय ह्येला. रेकतंय निसतं रेड्यासारखं. दहा मिनिटांनी मी दारावर लाथा घालायला सुरु करतो.

"दरवाजा आपटू नगो संप्या लौ**. तुटला बिटला तर सगळंच आवगड हुईल बर गा."- तो.


'आरं मग आटप की बेंचो. मला जायाचाय जरा.' - मी.


"कुटं पोरं पाजाय जायाचाय सकाळ सकाळ? आं? आरं हितं लगा माजा आजून तोंडाला साबन लावायचा राह्यलाय.. आजून माजा पोटाला साबन लावायचा राह्यलाय... आजून माजा मांडीला साबन लावायचा राह्यलाय.. आजून माजा गांडीला साबन लावायचा राह्यलाय.. आन तुजं काय्ये मदीच?"- तो.


हा गृहस्थ साबन फक्त मोती च वापरतो. लोकं खास दिवाळीसाठी वापरतेत. आनी हे कुठं कुठं लावतंय बगा.

मी त्याचा नाद सोडतो. हॉस्टेलपुढच्या हौदातनं बादली बुचकाळून काढतो. अंगावर उपडी करतो. साबण मात्र मी लाईफ-बॉय च वापरतो. मोती चा नॉशिया आलाय.


पुढे कधीतरी मी त्याला हसारामबापूचं 'युवाधन सुरक्षा' भेट देतो. कारण ते शांपू वगैरे म्हणजे युवकांचं धन अस्तं. ते सुरक्षित ठेवायचं अस्तं. असं भिंती रंगवण्यात वाया घालवायचं नस्तंय. चांगलं मार्गदर्शन केलंय बापूनी त्यात.

काय नाय, मनात पाप आलं की लगेच पोट आत खेचायचं. श्वास रोखून धरायचा. डोळे मिटायचे. आनी आईवडीलांचं स्मरण करायचं. पाप जसं आलं तसं आपोआप निगून जातं. आपण फक्त तटस्थपनी बगत राह्याचं. आणि हे सगळं उभ्या उभ्यापन करता येतं. कारन पाप कदी येईल काय सांगता येत नाय. आपण आपलं सारखं सावध राह्यलेलं बरं.

अर्थात, नंतर ते स्वतःच पोट आत खेचायचं विसरले ऐनवेळी. म्हातारपनात विसरतो मानूस. आनी मग जेलात जावं लागलं त्येन्ला. पन ही लै नंतरची गोष्ट झाली. लाईफ इज स्ट्रेंज, यू नो ? या या आय नो.


"या या आय नो"- माझ्या जोडीदाराची चष्मिश क्लासमेट सारखं असं म्हणायची आणि नंतर कॉलेज मॅगझिनमध्ये चिरंतन प्रेमावर कविता लिहायची.

ज्या दिवसांत ऊसाच्या बैलगाड्यांच्या सलग रांगा सह्याद्री कारखान्याकडे जाताना दिसायच्या, त्याच दिवसांतल्या संध्याकाळी ती हातात पुस्तक घेऊन चाललेली दिसते.

मान तिरकी करून बघितलं तर 'ही वाट एकटीची' असं नाव दिसतं. बहुतेक त्या क्षणी तिच्या 'या या आय नो' ची भीती माझ्यापुरती फुस्स होते.

परंतु म्हणून एकूण स्त्री-जातीची म्हणून एक दहशत असते, ती गेली असं होत नाही. ती राहतेच कायम. कारण पोरी म्हणजे काय जोक हे का राव? त्या जोखतेत बरोबर. ठरवलं तर सगळ्या पुरूषपणाला आग लावतेल.‌ ते बी एकदम सुम्ममधी. हासत हासत. कळनार बी नाय, कदी झालं काय झालं कसं झालं.


तिकडे तीपन डोळ्यांच्या कोनातून माझ्याकडे बघते. नजरानजर होते. नजरांची टक्कर होते. नाही, आसमंतात कसलाही वीजांचा कडकडाट होत नाही. किंवा काळ थबकत नाही. किंवा पक्षी उडता उडता अचानक स्तब्ध होत नाहीत. किंवा कयामत ची कहर रात्रही माझ्यावर कोसळत नाही. माझ्या आधीच्या पिढीत हे सगळं व्हायचं. आणि तुम्ही आजकालची मुलं मुली तर पहिल्याच भेटीत डायरेक्ट हल्लाच करता एकमेकांवर, असं मी ऐकून आहे. मला माहित नाही. मी मिलेनियल जनरेशनचा. ना धड इकडचा, ना तिकडचा.


मला फक्त ती बैलगाडीतून सपासप ऊस ओढून काढताना दिसते. ज्या चपळाईनं तिनं ते केलं ते बघून मी अवाक होतो. आता ही झाशीच्या राणीसारखी ऊसाची मोळी पाठीशी बांधून जाईल की काय होस्टेलपर्यंत?


"अरे, तुमची ती अलका कुबल डेंजराय बरं गा..!"- मी जोडीदाराला फोन करून माझा अभिप्राय व्यक्त करतो.


--------------++++++--------------++++------

---------------++++++--------------++++-----

३.


कट टू :


पंढरपूरच्या वेशीवर जसा एक कराड नाका आहे, तसा कराडच्या वेशीवर पंढरपूर नाका नाही. कराडात त्याऐवजी कॅनॉल स्टॉप आहे. जसे इतर शहरांत ट्रॅफिक हवालदार आंबे पाडण्यासाठी वळणांवर दबा धरून उभे असतात, तसे या स्टॉपवरही आडोशाला उभे असतात.


बाईकवर ट्रिपल सीट निघालेले विद्यार्थी दिसतात. एक हवालदार हवेतून अचानक प्रकट होऊन त्यांस साईडला घेतो. प्रसंगाचं गांभीर्य ओळखून मधला विद्यार्थी लगेच पुढच्याच्या पाठीवर मान टाकून जोरजोरात कण्हायला लागतो. आजारी असल्याचं कहर ढोंग चालू करतो. बाईकवर सगळ्यात मागं बसलेला विद्यार्थी भर घालतो की, आमचा रूममेट आजारीय. तापानं फणफणलंय. दवाखान्यात घिऊन चाल्लोय. एवढा वेळ जाऊ द्या ओ काका.


हवालदार आमच्यावेळचे दयाळू असतात.‌ "आरं तुमी इंजनेरींगची पोरं. कळाय पायजे तुमचं तुमाला." वगैरे किरकोळ खडसावून सोडून देतात. फारच झालं तर एखादेवेळी रस्त्यावर उठाबशा काढायला लावतात.


त्याबद्दल काय तक्रार नव्हती. फक्त हे कुणी एखाद्या उनाड मैनेनं बघू नये, एवढीच इच्छा असायची. कारण नंतर मग ती मैना गर्ल्स हॉस्टेलवर जाऊन सांगणार कुणालातरी की, अगं तुझ्या त्या छाव्याला काल मी कॅनॉल वर उठाबशा काढताना बघितलं. मस्त कानबिन पकडून उठाबशा काढायलेला अन् चोरासारखा बगत होता इकडं तिकडं.‌ भारी मज्जा.!


मग मध्यरात्री फ्री टॉक-टाईम चालू झाल्यावर कुणाचातरी फोन येणार फिदीफिदी हसत की, मला काई बोल्ला नाईस ते? किती काढल्यास उठाबशा? फार दुखत असतील ना पाय वगैरे? आणि तू डाकूसारखा दिसत होतास म्हणे? खरंय का? का असा डाकूसारखा दिसतोस तू?

कळत नाही, काय जादू असते काहींच्या आवाजात. ! उत्साहानं ऊतू जाणाऱ्या त्या थट्टेखोर आवाजातून तिचं असणं सर्वत्र व्यापून राहतं. चांदणं चांदणं होतं सगळं. 

असो..! हे सगळं असोच आता..! आता काय कवी वगैरे होणं परवडण्यासारखं राह्यलं नाय आपल्याला.  


बाकी, हे ट्रिपलसीटवाले आजारी मित्राच्या उपचारासाठी प्रभात नामक थिएटरला चाललेले असतात. 'जन्नत' सिनेमा लागलेला असतो. त्यातलं 'चार दिनों का प्यार ओ रब्बा, लंबी जुदाई, लंबी जुदाई' हे गाणं चालू होतं तेव्हा लोक वळून इकडं तिकडं वर खाली बघायला लागतात की नक्की आवाज कुठून येतोय.? पांडवांच्या मयसभेत गांगरून गेलेले कौरव आठवतात. पण इथलं बावचळणं हे साऊंड सिस्टीम डबा फुटल्यासारखी असल्यामुळे होत असावं.‌


परंतु तरीही हे थिएटर फारच बरं. कारण शेवटी सगळं सापेक्ष असतं. म्हणजे नवीन नवीन कराडात आलेले असताना हे ट्रिपलसीटवाले एकदा घाटावर गेलेले असतात. तिथे भरपूर वळून वळून बघितल्यानंतर आणि बऱ्यापैकी गोल्डफ्लेकी ओढल्यानंतरही आयुष्यातला फारसा वेळ कटलेला नाही, हे लक्षात येतं.


बारची वेळ होईपर्यंत राह्यलेल्या वेळाचं करायचं काय? कसं डील करायचं त्याच्याशी?

म्हणून घाटाशेजारी असणाऱ्या एका निनावी थेटराकडे त्यांचा मोर्चा वळतो. थिएटरमध्ये जाऊन अश्लील मूव्ही बघणं एकाच्या तत्वात बसत नाही. परंतु दुसरा एकजण युक्तिवाद करतो की नेट कॅफेत तर आपण नेहमीच बघतो. इथे मोठ्या स्क्रीनवर सगळं मोठं मोठं दिसतं. चल.


तिथल्या पायऱ्यांवर एक फटीचर मनुष्य झोक जाऊन आडवा-तिडवा डायगोनली अस्ताव्यस्त विखुरलेला दिसतो. आत लागलेला 'प्यासी चुडैल' सिनेमा बघितल्यामुळं या मनुष्याला सदमा बसलेला दिसतो.


आपणही असेच पागल होऊन बघू म्हणत ते भुरटे त्या थिएटरच्या आदिम अंधारात प्रवेश करतात.

कधीकाळच्या कुशन फाटून ध्वस्त झालेल्या खुर्च्यांत बसण्यापूर्वी लोकल कराडातला एक क्लासमेट खणखणीत आवाजात ओरडून ब्रीफींग करतो, "नीट बघून सांभाळून बसा भावांनो.‌ इथली ढेकणं बदमाश आहेत. सरळ सामानापाशी जाऊन खेळत बसतेत. अणुबाँब टाकला तरी मरणार नाईत. आनी वॉश्रुम बिश्रुम काय लाड नाईय्ये इथं. बेवडी लोकं खुर्च्यांवर पन मुतून जातेत कदी कदी. पिच्चर गंडला तर आपन पन तेच करायचं हे. टिल देन, एंजॉय द इव्हनिंग. फ्लोअर इज योर्स.!"


(क्रमशः)

Tuesday 6 February 2024

पुस्तक परिचय - ' खून पहावा करून ' - इमॅन्युअल व्हिन्सेंट सॅंडर.

 'खून पहावा करून' - इमॅन्युअल व्हिन्सेंट सॅंडर.

प्रथम आवृत्ती - ऑक्टोबर २०२३. सांगाती प्रकाशन.

समीर चौधरी हा या कादंबरीचा प्रॊटॅगनिस्ट. तो वर्तमानकाळाला मस्तपैकी कंटाळलेला तरूण आहे. त्याला एक अनुभव म्हणून खून करून बघायचा असतो, तर त्यासंबंधी रचना आहे.
तो समाजाच्या काठाकाठानं वावरणारा माणूस आहे.
शिवाय ह्यात सेक्शुअल फॅंटसीजबद्दल फारच मोकळेपणाने लिहिलं गेलंय. फॅंटसीचा आधार घेतल्यामुळे तसं लिहिता आलंय. परंतु तरीही हे धाडसाचं काम आहे. त्याबद्दल मार्क्स दिले पाहिजेत. निवेदनामध्ये केलेले भाषेचे प्रयोग इंटरेस्टिंग आहेत. एकाच वेळी वाचकाला मजकूराशी चुंबकासारखं चिकटवून ठेवायचं, आणि त्याच वेळी ग्रेट काहीतरी सांगायचं, हे यात उत्तम जमलंय.

रोलर कोस्टर राईड सारखं आहे. अनुभवांचं, निरीक्षणांचं, आठवणींचं, पात्रांप्रमाणे बदलणाऱ्या संवादांचं वैविध्य आहे. वेगही कायम राहतो. आणि सेन्स ऑफ ह्युमर तर उच्चच आहे म्हणजे. त्याला काही लिमिटच नाही. कारण काहीही लपवून न ठेवता, न बिचकता लिहायचं असं ठरवलंयच म्हटल्यावर काय..!
वाचता वाचता मध्येच ''प्रेम कसं असावं?' नावाची एक कविता येते. तर त्यातली पहिलीच ओळ वाचली आणि स्फोट झाल्यासारखं हसू फुटलं. न आवरता येणारं, ठसका लागेल असं हासू. नंतर तो मजकूर आठवला की पुन्हा पुन्हा त्याच इंटेन्सिटीनं हसण्याचा जोरदार ॲटॅक येतो. आणि असं हसल्यामुळे समाज, संस्कृती, नीतीमू्ल्ये, नातेसंबंध, नातेवाईक यांकडे बघण्याचे जे अदृश्य मानसिक दडपण किंवा कप्पेबंद दृष्टी असते, ती खुली होते. कारण शेवटी सगळं आपल्या मानण्यावरच असतंय.

तर ही एक सर्वार्थाने वेगळी अनोखी कादंबरी वाटली.
लेखकाला पुस्तकं कशी वाचली जातात, याची बारकाईने माहिती आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचताना लेखक वाचकांना चकवतो, खेळवतो. पुढचा मजकूर काय येणार आहे, हे वाचक कधीच गृहीत धरू शकत नाही. एखाद्या अनुभवी शिकाऱ्यानं ट्रॅप लावावेत तसे यात जागोजागी वाचकांसाठी ट्रॅप लावले आहेत. लेखक स्वतः एक जबरदस्त वाचक असल्याशिवाय असा आत्मविश्वास येत नाही.‌

या कादंबरीचे वाचन म्हणजे वास्तव आणि फॅंटसीचा मिलाफ असलेला एक भन्नाट प्रवास आहे. आणि ह्या वाचनप्रवासात लेखक शेवटपर्यंत आपल्या आसपास वावरत असतो. तो काही आपली मानगूट सोडत नाही. आणि आपणही सोडवून घेत नाही. कारण आशयही तसा खच्चून भरला आहे.

साधी गोष्ट

  स्वारगेटला उतरलो. बस स्टॅंडवर उद्घोषणा. प्रवाशांनी आपलं सामान कुठल्याही अनोळखी व्यक्तीच्या ताब्यात देऊ नये . अश्लील आहे हे. पण तसं बघायला ...