१. ओठांवर कोवळी लव फुटू लागलेल्या कॉलेजवयीन मुलांची भाषा कानावर पडते. अशी बेमुरव्वत रग कधीकाळी आपल्या आतही होती आणि तिच्या फोर्समुळे आपणही याच भाषेतून जगाशी संवाद साधत होतो, हे आठवून कसंसंच वाटतं.
तोंडातून बाहेर पडणाऱ्या कोणत्याही वाक्याचा अंत अस्ति आरंभ करायचा झाल्यास लवड्या सोडून इतर कोणता शब्दच जवळ असू नये, ही परिस्थिती मोठी आश्चर्याची वाटते. अर्थात, सगळं करून भागल्यावर आज मला तसं वाटणं साहजिकच आहे. पण सवाल इथं माझा नाहीये. सवाल, माझं नक्की काय काय करून भागलं आहे, हा ही नाहीये.
सवाल हा आहे की सभ्य नागरी समाजाचे सदस्य म्हणून जगण्याचा आपण जो ठराव पास केला आहे, त्याचं काय? तो ठराव राजरोस उद्ध्वस्त करणाऱ्या त्या विवक्षित शब्दाचं आपण काय करणार आहोत? सांगा ना काय करणार आहात? सांगा की.! तुम्हाला विचारतोय.! हे असं ऐकून न ऐकल्यासारखं करणं, हा एक मार्ग झाला. पण ती सोयीस्कर पळवाट होय. वडिलकीच्या नात्याने त्या मुलांना एखादं भाषण सुनावून पोबारा करणं, हा दुसरा एक मार्ग झाला. पण तेही तसं रिस्कीच आहे. कारण या देशात भाषण ठोकून सुरक्षित पोबारा करायची सूट फक्त एकाच माणसाला आहे.
२. पाऊस सलग सलग. बऱ्याच दिवसांनी गुडलक कॅफेच्या आसऱ्याला जाऊन बसलो, तर तिथं नेमका बोगस शिळा समोसा आणि बकवास चहा वाट्याला आला. त्यात भरीस भर म्हणजे कॉलेजमधला जगदाळे अचानक भेटला. ओळख दाखवत आला आणि खुर्ची ओढून बसलाच ऐसपैस. मग थापांचा प्रवाह सुरू झाला. " मस्त मजेत चाललंय. सध्या चाकणला असतो, मर्सिडीज बेंझ मध्ये. सहकार नगरला एक बंगला घेतलाय. रिनोवेशन करायचंय. आता सेटल झालं पायजे मलापण. डिसेंबरमध्ये लग्न करतोय. बायको आयटीत असते. फोन करतो, लग्नाला ये. नंतर मग फेब्रुवारीत आमचं जर्मनीला जायचं चाललंय" वगैरे.
३. श्रीराम लागू रंग अवकाश ला जॉयराईड म्हणून एक नाटक होतं. विभावरी देशपांडेंचं नाव बघून गेलो, पण काही खास नव्हतं. नंतर नंतर तर पात्रांच्या जागी बॉसची कल्पना करायला लागलो. मग ते समोरच्या स्टेजवरून कसा कसा अभिनय करतील वगैरे कल्पना रंगवत बसून राहिलो. "नाय नाय नाय. असं चालणार नाय!" म्हणत दोन्ही हात हलवत खुर्चीतून किंचाळत उठतानाही दिसायला लागले. असं काहीबाही मनात खेळवत असतानाच नाटक संपलं. अंगाला चिटकलं नाही. दुसऱ्या मिनिटाला सॅकमधून जर्कीन काढत बाहेर पडलो. संपली सगळी कलाबिला ऑन दि स्पॉट.
येताना दहीहंडीचा दणदणाट. फुल्ल ट्रॅफिक जॅम. डॉल्बीच्या भिंतींपुढून सरकतानाची दहा मिनिटं मरणप्राय. कानाच्या पडद्यावर दुखरी कंपनं आदळत राहिली. एका हाताने कान दाबून दुसऱ्या हातानं हॅंडल पकडत कसाबसा निसटलो. अजून थोडा वेळ अडकलो असतो तर पडदा फाटलाच असता. कृष्णानं पाच हजार वर्षांपूर्वी चोरून लोणी खाल्लं नसतं तर, हे सगळं या लेव्हलला गेलंच नसतं.
(असं बघ संप्या, की यात काहीतरी लिंक पाहिजे, सातत्य पाहिजे. काही ठिकाणी विस्तार पाहिजे. हे असं तुकडे तुकडे जोडत भरकन पुढं सरकणं, म्हणजे चंचलतेचं लक्षण आहे. तुझी इम्मॅच्युरिटी पुन्हा उफाळून आलीय की काय?)
किंवा कधी मॉलमधून कार्ड पेमेंट करून कार्ड नीट पाकीटात ठेवून रस्त्याला लागतो. तरीही निम्म्या वाटेत हुरहूर लागते की कार्ड घेतलं की विसरलो तिथंच? मग बाईक साईडला घेऊन जीन्सच्या खिशातून वॉलेट काढून चेक करावं लागतं.
किंवा एखाद्याला काही कामाचा व्हॉट्सअप मेसेज पाठवायचा असतो. तसा तो पाठवतो. पण थोड्या वेळानं दचकतो की तो मेसेज पर्सनल नंबरवर पाठवला की चुकून एखाद्या ऑफिशियल ग्रुपवर पाठवून दिला?? बापरे.!
No comments:
Post a Comment