Sunday, 4 May 2025

'सिंधुतील साम्राज्ये'- पुस्तक परिचय

सिंधू नदीची एक अद्भुत बायोग्राफी असं या पुस्तकाचं वर्णन करता येईल. सिंधुकाठी बहरलेल्या अनेकानेक लोकसंस्कृत्यांचा मनोज्ञ धांडोळा या पुस्तकात आहे. कराचीतील सिंधूच्या मुखापासून ते तिबेटमधील उगमापर्यंतचा प्रदीर्घ प्रवास (आणि घनघोर रिसर्च) करून या लेखिकेनं हे पुस्तक लिहिलं आहे.
सिंधूच्या काठाकाठानं, तसेच तिच्या उपनद्यांच्या अंतर्भागातून आडवातिडवा प्रवास करत लेखिकेनं आपल्यासमोर स्थलकालाचा एक भव्य भरजरी पट उलगडलेला आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत, चीन आणि तिबेट अशा देशांमध्ये पसरलेल्या सिंधू नदीची ही चित्तवेधक कहाणी आहे. या महाकाव्यामध्ये हरवून जायला होतं.

या लेखिकेचं वैशिष्ट्य म्हणजे ती चांगलं लिहिते. हिची कथनाची शैली अनोखी आहे. भाषेवर हिची घनघोर पकड आहे. या पुस्तकात काही ठिकाणी वेगवेगळ्या धर्माच्या अनुयायांची न रूचणारी सत्यं सांगताना लेखिकेची खुसखुशीत विनोदबुद्धी चांगलीच उपयोगी पडते.

या प्रवासात लेखिकेनं लोकसंस्कृत्या, त्यांचे गुणावगुण, इतिहास, पुरातत्व-वारसा स्थळे, भूगोल, वास्तुकला, पर्यावरण, राजकीय परिस्थिती, अशा विविध अंगांना खोलवर स्पर्श केल्यामुळे हे पुस्तक वाचताना वाचनाचा महामूर आनंद मिळतो. प्रत्येक ठिकाणच्या लोकजीवनांचं, त्यांच्या चालीरीतींचं रोचक वर्णन यात आढळतं. 

सिंधूच्या काठावर वसलेल्या हडप्पा- मोहेंजोदारो, बौद्ध स्तूप, लेणी, मंदिरे, दर्गे, गुरूद्वारे हे सर्व यात अतिशय हृदयस्पर्शी पद्धतीने मांडलं आहे की त्यामुळे लगेहात यूट्यूबवर त्या स्थळांचे व्हिडीओ शोधून बघण्याचा मोह आवरता येत नाही.‌ शिवाय सिंधुकाठावर हिंदू, बौद्ध, इस्लाम आणि शीख ह्या धर्मांचं संश्लेषण आणि त्यांनी एकमेकांवर टाकलेले प्रभाव.! हे वाचताना आपण कधी वेदकाळात, कधी बौध्द काळात, कधी सूफी फकीरांच्या बहराच्या काळात, कधी सिकंदराच्या तर कधी ब्रिटिशांच्या काळात, तर कधी गुरू नानकांच्या काळात जाऊन पोचतो. आपला पतंग असा इतिहासावकाशात उडवता उडवता लेखिका मध्ये मध्ये अचानक दोराला हलका झटका देऊन वर्तमानात परत आणते. स्थलकालात असं विनायास मागे-पुढे विहरण्याची तिची पद्धत भलतीच रोचक आहे.

लेखिका सिंधू खोऱ्यातील अशा अशा अनघड ठिकाणी पाय तुडवत गेलेली आहे की आपण तिथे जाण्याची फक्त कल्पनाच करू शकतो.! विशेषतः आदिवासी दुर्गम पहाडी प्रदेशांमधले प्रवास, (आणि तेथली दिलखुलास आदरातिथ्यं), अफगाणिस्तान- तालिबान-स्वात खोऱ्यांतून बेकायदेशीर सीमा ओलांडून केलेले जीवावर बेततील असे प्रवास हिने कुठल्या अतूट विश्वासाच्या बळावर केले असतील, कळत नाही.!

साधारण साडेतीनशे पानांचं पुस्तक असून यात बारा प्रकरणं आहेत. 'सिंधुकाठचे संत' आणि 'रेशीम मार्गावरचा बुद्ध' ही प्रकरणं फारच जास्त भावली.

'विलुप्त होत चाललेली नदी' या शेवटच्या प्रकरणातून सांगितलेला, लाखो वर्षांपासून करोडो लोकांना जीवन देत वाहत आलेल्या सिंधू नदीचा अलीकडे होत असलेला पर्यावरणीय नाश मात्र प्रचंड अस्वस्थ करत राहतो. कोण कुठली ॲलिस अल्बिनिया लंडनवरून येऊन एवढं आपलेपणानं लिहिते सिंधुबद्दल आणि आपण असे की.. असो.




Thursday, 24 April 2025

बी ॲज यू आर - पुस्तक परिचय

रमण महर्षी हे अलीकडच्या काळातील एक एनलाईटन्ड मनुष्य होते. हे या पुस्तकातून झळकतंच म्हणजे. यामध्ये प्रश्नोत्तरे आहेत. त्यांच्याकडे लोक यायचे, प्रश्न विचारायचे, समस्या सांगायचे. त्याअनुषंगाने त्यांनी दिलेली उत्तरं आहेत. समोरच्या मनुष्यानं ज्या पातळीवरून प्रश्न विचारला आहे, त्या पातळीवर पोहचून उत्तरं दिलेली आहेत. म्हटलं तर खूप डीप फिलॉसॉफीकल डिस्कशन्स आहेत, म्हटलं तर अगदी साधे सरळ सोपे संवाद आहेत.

त्यांची ही उत्तरं/चर्चा त्यांच्या सहकाऱ्यांनी त्याकाळी लिहून ठेवलेली, त्यांचं कलेक्शन नंतर वेगवेगळ्या पुस्तकांच्या रूपाने प्रकाशित झालं. (मराठीत नॅशनल बुक ट्रस्टनं प्रकाशित केलेलं 'रमण महर्षी', तसेच प्रज्ञा सुखटणकर यांनी मराठीत भाषांतरित केलेली काही पुस्तकं आहेत.) पण हे "बी ॲज यू आर" हे इंग्रजी पुस्तक फारच चांगलं आहे. डेव्हिड गॉडमन या त्यांच्या शिष्याचे प्रचंड कष्ट यापाठीमागे आहेत. या पुस्तकाबाबत असं म्हणायचा मोह होतो की हे वाचलं तर स्पिरीच्युॲलिटीसंबंधी इतर कुठल्या पुस्तकाची आवश्यकताच वाटत नाही.

विचारले गेलेले प्रश्न क्वालिटीचे आहेत. त्यावर महर्षींची उत्तरं 'हटके' आहेत.‌ ही उत्तरं अवाक् करतात. मौन करतात. म्हणजे शब्दांची अर्थवहनातील मर्यादा लक्षात घेता, जे शब्दांच्या सहाय्याने जे सांगणं अशक्य आहे, तेही पोचवण्यात बऱ्यापैकी यशस्वी झालेले दिसतात.

ते उपदेश मोड टाळून मनाचं जंजाळ नेमकं कसं काम करतं, हे उलगडून दाखवण्यावर भर देतात. काही वेळा ते प्रश्नकर्त्यालाच एखादा मार्मिक (रामबाण) प्रश्न विचारतात आणि त्याला जोडून हळूहळू उपप्रश्नांची लड लावतात. त्या प्रश्नांचा मागोवा घेत जाण्यातून प्रश्नकर्त्याला स्वतःलाच उत्तरापर्यंत जाण्याचं सुचवतात. 'मी कुणीतरी गुरू बसलोय इथे, आणि आता तुम्ही माझं मुकाट ऐका' असला आविर्भाव त्यांच्याठायी कणभरही जाणवत नाही.

त्यांचा असा कुठलाही ध्यानविधी वगैरे नाही. त्यांच्या एकूण शिकवणुकीचा गाभा म्हटला तर 'सेल्फ एन्क्वायरी' किंवा 'आत्म-विचारणा' हा आहे. म्हणजे मनाला सतत प्रश्न विचारा. धांडोळा घ्या. प्रश्न, त्यामागे आणखी एक प्रश्न, त्यापाठीमागे पुन्हा आणखी एक प्रश्न असं करत करत मागे मागे इन्फिनिटी पर्यंत.! या प्रक्रियेत मन संभ्रमात पडतं. अवचित गळून पडतं. विलीन होतं.

हे म्हणजे मनाचा वापर करून मनाला निर्विचार करणं.‌ मनाचा वापर करून मनाचा अंत घडवून आणणं. आणि हे सगळं तर्काच्या आधारे.! कुठंही 'हे माना' 'ते माना' 'यावर विश्वास ठेवा', 'त्यावर श्रद्धा ठेवा', 'अमुक शास्त्र असं असं सांगतं', 'तमुक ज्ञानी असं असं म्हणतो' वगैरे काही नाही. किंवा उगीच उदाहरणं/कथा-किस्से सांगून पाल्हाळ लावणं नाही. ते थेट मुद्द्यालाच हात घालतात आणि शेवटपर्यंत धरून ठेवतात. तर असा हा शुद्ध ज्ञानमार्ग. स्वतःच स्वतःला विचारून बघा आणि जाणा. 



[रमण महर्षींसंबंधी थोडी अधिकची माहिती :

देहावसान (१९५०) होईपर्यंत ते तमिळनाडूमधील अरूणाचल पर्वत परिसरात राहत होते. ते स्थळ रमणाश्रम म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांची राहणी अतिशय साधी सहज होती. आणि चेहऱ्यावर निर्मळ हासू. चांगलेपणाची बरसात करणारं.!

आयुष्यभर सर्ववेळ ते तिथे आश्रमात एका हॉलमध्ये बसून राहत. देशविदेशातून अध्यात्मिक जिज्ञासूंचा ओघ चालू असे. कुणीही यावं, बसावं. बोलायचं असेल तर बोलावं, काही विचारायचं असेल तर विचारावं. बोलायचं नसेल तर मौन बसावं. त्यांच्यापुढं सगळ्यांना मुक्त प्रवेश असे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सगळ्यांना ॲक्सेसिबल राहिले. सगळ्यांशी सारख्याच आत्मीयतेने बोलत राहिले.‌ व्हीआयपी/ सर्वसामान्य/गरीब/पैसेवाला/ प्रापंचिक/ साधक/ लहान मुलं/ जात-धर्म असला काही भेदभाव नाही. त्यांनी आजकालच्या काहीजणांसारखा स्पिरीच्युॲलिटीचा बाजार केला नाही. कर्मकांड, धार्मिक अवडंबर, चमकोगिरी, हारतुरे, बुवाबाजी, चमत्कार वगैरे काही नाही. ]

Monday, 3 February 2025

'गुरू'-पुस्तक परिचय

नितीन कोतापल्लेंची 'गुरू' ही कादंबरी अलीकडेच, जानेवारी २०२५ मध्ये प्रकाशित झालीय. फारच आवडली. म्हणजे यात एवढी कशिश आहे की एक संपूर्ण दिवस चिटकून बसलो आणि आरपार संपवूनच टाकली. पहिली तीन प्रकरण, 'दुःख', 'तृष्णा', 'गंध', एकदम क्लास आहेत. 'दुःख' या प्रकरणात एका प्रलयंकारी पावसाचं आणि त्यामुळे हाहाःकार उडालेल्या भावी शहराचं विदारक चित्रण वाचताना सारामागोच्या ‘ब्लाईंडनेस’ची आठवण झाली. आख्खं प्रकरणभर असा कहर बरसणारा, जाणीवा सुंद करून टाकणारा पाऊस मराठीत आजवर झालेलाच नाहीये.!

एकविसाव्या शतकाच्या या पूर्वार्धातली जीवनशैली, तिची गुंतागुंत, त्याखाली रगडल्या जाणाऱ्या माणसांची नस यामध्ये नेमकेपणाने पकडलीय.‌ रिअल इस्टेटशी, नगररचनेशी संबंधित व्यवहारांतील भाषेची लेखकाला फार चांगली जाण आहे.‌ शिवाय आश्रमांचं, कार्पोरेट बुवाबाजीचं, मिडीयाचं, सोशल मिडियाचं, एकूणच सगळ्या जगण्याच्याच बाजारीकरणाचं चित्रण वास्तवदर्शी आहे. एखादा गंभीर लेखक किती अनेक अंगांनी भोवतालाचा वेध घेऊ शकतो, बाजार-व्यवस्थेकडून हे जे मायाजाल विणलं गेलंय, त्याला किती ताकदीनं भिडू शकतो, आणि ते ध्वस्तही करू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

कादंबरी एकूण सहाशे पानांची आहे. थकवणारी आहे. त्यापैकी ३३६ व्या पानापर्यंत सगळं जबरदस्त आहे.! पण तिथून पुढे जरा वेगळाच गिअर टाकलाय. तिथून वास्तवाचा सांधा सुटून कल्पिताच्या, स्वप्नाच्या प्रदेशात जास्तच वावरत गेल्यासारखी वाटते (म्हणजे मला तरी तसं वाटलं). तरीही अवश्यमेव वाचण्यासारखी आहे.

समकालीन हिंदी साहित्यात असा मोठा अवकाश निरखणारे, तेवढा दमसांस असणारे चार-पाच लेखक वाचून माहिती झाले आहेत. आता मराठीतही अशा एका दमदार कादंबरीचं आगमन झालं आहे, याचं अप्रूप/कौतुक वाटलं.



Monday, 27 January 2025

बिनकामाच्या नोंदी

 १. ओठांवर कोवळी लव फुटू लागलेल्या कॉलेजवयीन मुलांची भाषा कानावर पडते. अशी बेमुरव्वत रग कधीकाळी आपल्या आतही होती आणि तिच्या फोर्समुळे आपणही याच भाषेतून जगाशी संवाद साधत होतो, हे आठवून कसंसंच वाटतं.

तोंडातून बाहेर पडणाऱ्या कोणत्याही वाक्याचा अंत अस्ति आरंभ करायचा झाल्यास लवड्या सोडून इतर कोणता शब्दच जवळ असू नये, ही परिस्थिती मोठी आश्चर्याची वाटते. अर्थात, सगळं करून भागल्यावर आज मला तसं वाटणं साहजिकच आहे. पण सवाल इथं माझा नाहीये. सवाल, माझं नक्की काय काय करून भागलं आहे, हा ही नाहीये.

सवाल हा आहे की सभ्य नागरी समाजाचे सदस्य म्हणून जगण्याचा आपण जो ठराव पास केला आहे, त्याचं काय? तो ठराव राजरोस उद्ध्वस्त करणाऱ्या त्या विवक्षित शब्दाचं आपण काय करणार आहोत? सांगा ना काय करणार आहात? सांगा की.! तुम्हाला विचारतोय.! हे असं ऐकून न ऐकल्यासारखं करणं, हा एक मार्ग झाला. पण ती सोयीस्कर पळवाट होय. वडिलकीच्या नात्याने त्या मुलांना एखादं भाषण सुनावून पोबारा करणं, हा दुसरा एक मार्ग झाला. पण तेही तसं रिस्कीच आहे. कारण या देशात भाषण ठोकून सुरक्षित पोबारा करायची सूट फक्त एकाच माणसाला आहे.

२. पाऊस सलग सलग. बऱ्याच दिवसांनी गुडलक कॅफेच्या आसऱ्याला जाऊन बसलो, तर तिथं नेमका बोगस शिळा समोसा आणि बकवास चहा वाट्याला आला. त्यात भरीस भर म्हणजे कॉलेजमधला जगदाळे अचानक भेटला. ओळख दाखवत आला आणि खुर्ची ओढून बसलाच ऐसपैस. मग थापांचा प्रवाह सुरू झाला. " मस्त मजेत चाललंय. सध्या चाकणला असतो, मर्सिडीज बेंझ मध्ये.‌ सहकार नगरला एक बंगला घेतलाय. रिनोवेशन करायचंय. आता सेटल झालं पायजे मलापण. डिसेंबरमध्ये लग्न करतोय. बायको आयटीत असते. फोन करतो, लग्नाला ये. नंतर मग फेब्रुवारीत आमचं जर्मनीला जायचं चाललंय" वगैरे.

मी "वा ! वा ! छान छान!" करत उरकलं आणि बाहेर पडलो.
आता हा भामटा सहकारनगर वरनं चाकणला कसा जातो रोज ? उडत उडत की लोटांगण घालत? आणि याच्या बापानं तरी जर्मनीचं नाव ऐकलं होतं का? साला ऐकून घेणारा भेटला की हा चालूच होतो सुसाट. जुनी खोड गेलेली दिसत नाय अजून.

३. श्रीराम लागू रंग अवकाश ला जॉयराईड म्हणून एक नाटक होतं.‌ विभावरी देशपांडेंचं नाव बघून गेलो, पण काही खास नव्हतं.‌ नंतर नंतर तर पात्रांच्या जागी बॉसची कल्पना करायला लागलो. मग ते समोरच्या स्टेजवरून कसा कसा अभिनय करतील वगैरे कल्पना रंगवत बसून राहिलो. "नाय नाय नाय. असं चालणार नाय!" म्हणत दोन्ही हात हलवत खुर्चीतून किंचाळत उठतानाही दिसायला लागले. असं काहीबाही मनात खेळवत असतानाच नाटक संपलं. अंगाला चिटकलं नाही. दुसऱ्या मिनिटाला सॅकमधून जर्कीन काढत बाहेर पडलो.‌ संपली सगळी कलाबिला ऑन दि स्पॉट.

येताना दहीहंडीचा दणदणाट. फुल्ल ट्रॅफिक जॅम. डॉल्बीच्या भिंतींपुढून सरकतानाची दहा मिनिटं मरणप्राय. कानाच्या पडद्यावर दुखरी कंपनं आदळत राहिली. एका हाताने कान दाबून दुसऱ्या हातानं हॅंडल पकडत कसाबसा निसटलो. अजून थोडा वेळ अडकलो असतो तर पडदा फाटलाच असता. कृष्णानं पाच हजार वर्षांपूर्वी चोरून लोणी खाल्लं नसतं तर, हे सगळं या लेव्हलला गेलंच नसतं.

(असं बघ संप्या, की यात काहीतरी लिंक पाहिजे, सातत्य पाहिजे. काही ठिकाणी विस्तार पाहिजे. हे असं तुकडे तुकडे जोडत भरकन पुढं सरकणं, म्हणजे चंचलतेचं लक्षण आहे. तुझी इम्मॅच्युरिटी पुन्हा उफाळून आलीय की काय?)

. यूट्यूबवर येल युनिव्हर्सिटीचा कुणी प्रोफेसर दिसला. सांगत होता की, "समजा मी लेक्चर देत असलो आणि त्याचवेळी माझा रिलेटीव्ह आजारी असल्याची बातमी मला मिळाली; तर मी विद्यार्थ्यांना सांगेन की आत्ताच मला एक वाईट बातमी मिळालीय, पण तरीही मी प्रयत्न करेन की त्या बातमीचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही.‌"
ग्रेट!! अमेरिकेत समजा असला च्युतापा खपून जात असेल. पण इथं त्याचं काय होय? इथं लोक खोटंखोटं आजारी पडून महिना महिना कामावरून फरार होतात. आणि पुन्हा येताना असंच कुठूनतरी बनावट मेडिकल सर्टिफिकेट उचलून आणतात. पाठवू काय तिकडं तुमच्या क्लासमध्ये? पाठवू?

. हा एक निराळाच प्रॉब्लेम मागं लागलाय. वेळीच आवर घातला पाहिजे. नाहीतर केस हाताबाहेर जाणार.
म्हणजे जिना उतरून खाली आल्यावर अचानक वाटतं की कुलूप लावायचं विसरलो की काय? मग चेक करायला पुन्हा जिना चढून वर जावं लागतं.

किंवा कधी मॉलमधून कार्ड पेमेंट करून कार्ड नीट पाकीटात ठेवून रस्त्याला लागतो. तरीही निम्म्या वाटेत हुरहूर लागते की कार्ड घेतलं की विसरलो तिथंच? मग बाईक साईडला घेऊन जीन्सच्या खिशातून वॉलेट काढून चेक करावं लागतं.

किंवा एखाद्याला काही कामाचा व्हॉट्सअप मेसेज पाठवायचा असतो. तसा तो पाठवतो.‌ पण थोड्या वेळानं दचकतो की तो मेसेज पर्सनल नंबरवर पाठवला की चुकून एखाद्या ऑफिशियल ग्रुपवर पाठवून दिला?? बापरे.!

आता हा मानसिक रोग आहे. आणि तो हळूहळू आपल्यावर सवार होत चाललाय, हे उघडच आहे. कारण आता हे लिहितोय तर तेवढ्यातही राहून राहून वाटतंय की सकाळी निघताना हीटर बंद केला होता ना नक्की? की राहिला तसाच?
जाऊ दे च्यायला पेटू दे एकदाच सगळं. आग लागू दे सगळी.!

६. चार दिवस जोडून सुट्टी आली. सोलो ट्रीप काढायला पाहिजे कोकणात असं नुसतं ठरवत बसलो. केलं काहीच नाही. लोळत लोळत वाचत दिवस घालवले जागच्या जागी. एकदा फक्त पॅसिफिक मॉलमध्ये जाऊन आलो. सेल्सवुमन चांगलीच बडबडी होती. पण माझा मनहूस चेहरा बघून भल्याभल्यांचा जातो तसा तिचाही कॉन्फिडन्स गेला. शर्टचा चॉईस काही वाईट नव्हता तिचा, बाय द वे.
तर मग शिक्षा म्हणून माघारी येताना सेव्हन लव्हज् चौकात छोटासा अपघात झाला. मागून एका कारनं हलका डॅश मारला. खाली पडलो. पण विशेष काय नुकसान नाही. मान्य आहे की आपण हेडफोन्स घालून बाईक चालवत होतो. पण चूक सांगण्याची ही कुठली पद्धत आहे? सरळ डॅश मारता? वगैरे काय सगळं हिंदीत विचारत बसलो नाही. कारण हिंदीत भांडायचं म्हणजे.. असो.

Friday, 3 January 2025

'द लायब्ररी'

इथे या पुस्तकाचे दोन परिचय आहेत.

परिचय क्र. १ (कधीच काहीच न वाचणाऱ्यांसाठी) :

तुम्हाला वाचनाचा तिटकारा किंवा आळस किंवा निरूत्साह असेल. पुस्तक हातात घ्यायचं जीवावर येत असेल किंवा पुस्तक बघताच अंगावर काटा येत असेल. पण तरीही कधीकधी पुस्तकांबद्दल कुतूहल वाटत असेल, तर खास तुमच्यासाठी‌ हे पुस्तक आहे-- झोरान झिवकोविचचं 'द लायब्ररी'.! अलीकडेच नीतीन रिंढे या व्यासंगी व्यक्तीनं हे मराठीत भाषांतरित केलं आहे.

छोटेखानी पुस्तक आहे, शंभरेक पानांचं. याचा आकार अगदी तळहाताच्या पंजात मावेल एवढा आटोपशीर आहे. यात वाचनासंबंधी सहा छोट्या-छोट्या कथा आहेत, ज्या अद्भुत आणि धमाल आहेत. वाचताना मौज येते. भाषा अगदी सोपी सुंदर सुटसुटीत आहे. नवीन वर्षात वाचनाची सुरूवात करायची असेल तर हे अगदी परफेक्ट पुस्तक आहे.

फक्त एवढंच करावं लागेल की हे पुस्तक मिळवावं लागेल आणि सरळ पहिल्या कथेपासून वाचायला सुरुवात करावी लागेल.‌ बाकीचे सगळे बहाणे बाजूला ठेवून, मनाचा निश्चय करून हे एवढं एक पुस्तक जरी वाचलंत तरी वाचनाची मौज काय असते, याची झलक मिळेल. कळेल की पुस्तकांपासून मिळणारा आनंद हा जगातल्या इतर कुठल्याही आनंदाहून जास्त मंगलदायी असतो, असं काही लोक का म्हणतात ते !!

आणि एक गुड न्यूज म्हणजे हे पुस्तक वाचून संपवायला फक्त दोन-अडीच तास पुरेसे आहेत.! आयुष्यातले दोन-अडीच तास कुणीही नक्कीच काढू शकतं. एवढंही काही कुणी बिझी नसतं.!

परिचय क्र. २ (वाचणाऱ्यांसाठी) :
पुस्तकप्रेमी असाल तर तुमच्यासाठी यात निव्वळ आत्मप्रत्ययाचं सुख वाट बघत आहे.‌ पुस्तकं-वाचन अशा एकजिनसी सूत्रात गुंफलेल्या सहा कथा आहेत. या सर्व कथांमध्ये जादूई वास्तववाद रचलेला आहे.

'आभासी ग्रंथालय' या कथेत अशा एका रहस्यमयी वेबसाईटची कल्पना रंगवलेली आहे की ज्यावर भविष्यातील सर्व संभाव्य पुस्तकं आधीच प्रकाशित केलेली दिसतात.

'घरातलं ग्रंथालय' या कथेतल्या एका माणसाच्या पत्रपेटीत आपोआपच ग्रंथ येऊन प्रकट होत राहतात, ते साठवता साठवता त्याला बूड टेकायलाही जागा उरत नाही.

'रात्र-ग्रंथालय' या कथेत रात्रीच्या वेळी आत्म्यांच्या ग्रंथ-संग्रहात रूपांतरित होणारं ग्रंथालय आहे.

'नरकातलं ग्रंथालय' ही कथा अजिबात न वाचणाऱ्या माणसांना मृत्यूनंतर काय मजेशीर शिक्षा दिली जाते, यावर आहे.

'लघुत्तम ग्रंथालय' म्हणजे फक्त एकाच पुस्तकाची लायब्ररी. आणि हे जादूई पुस्तक सतत वेगवेगळ्या पुस्तकांची रूपं धारण करत असतं.

'घरंदाज ग्रंथालय' या कथेत फक्त आणि फक्त हार्ड बाउंड पुस्तकंच आवडणारा एक विक्षिप्त ग्रंथ संग्राहक आहे. आणि त्याच्या संग्रहात जेव्हा एक पेपरबॅक येऊन पडतं, तेव्हा त्या घुसखोर पुस्तकापासून तो स्वतःची सुटका कशी करून घेतो याची मिश्किल कहाणी आहे.

या एकूणच पुस्तकात काही आदरणीय पुस्तकविके, मुरलेले ग्रंथपाल, चॅप्टर लेखक, तसेच acquired taste विकसित झालेले चक्रम वाचक भेटू शकतात. त्यांचे एकेक नखरे पाहून ओठांची एक कड मुडपत सुरु झालेलं स्माईल हळूहळू सूक्ष्म गुदगुल्यांमध्ये रूपांतरित होत राहतं. जरूर वाचून पहा.‌ 


Tuesday, 31 December 2024

'कौरव सभा'

 मित्तरसैन मीत हे पंजाबमधले मोठे लेखक आहेत. त्यांची कौरवसभा ही मूळची पंजाबी कादंबरी आहे, तिचा भारतीय ज्ञानपीठानं हिंदी अनुवाद केलाय.

कादंबरी अजस्त्र आहे. तिला वेग आणि खोली असं दोन्ही आहे. हातात घेतली की संपवल्याशिवाय खाली ठेवणं अवघड आहे.‌ कोर्टकचेरीच्या आणि त्यामागे चालणाऱ्या पडद्याआडच्या हालचालींच्या जंजाळात आत आत हरवत चाललो तरी "पुढं काय होणार" याची उत्सुकता सुरूवातीपासून शेवटपर्यंत ताणलेली राहते. त्यामुळे दिवसभर मॅरेथॉन रिडींग.!

मायानगर नावाचं एक काल्पनिक शहर. तिथं घडलेला एक गुन्हा आणि त्यासंबंधी चाललेली कोर्टकेस, यांचा आधार घेऊन या कादंबरीचा डोलारा उभा आहे. न्यायाची व्यवस्था सडलेली आहे आणि खालपासून वरपर्यंत सगळे आपादमस्तक बरबटलेले आहेत, हे वरवर माहित असतं. पण ते नेमकं कसं? याचं जिवंत चित्रण यात येतं. महापुरानं भरलेली नदी जशी रोरावत येताना दिसावी तशी ही कादंबरी गाळण उडवते.

लेखक स्वतः आयुष्यभर वकील राहिलेले आहेत. त्यांनी हे सगळं आतून बघितलेलं आहे. तर हे बघितलेलं भोगलेलं वास्तव यात आलेलं आहे. 'भोगा हुआ यथार्थ' !

ते या व्यवस्थेशी संबंधित सगळे कंगोरे अत्यंत बारकाईनं उलगडून दाखवतात. व्यवस्थेतला कुठलाच पैलू ते सोडत नाहीत.‌ या माणसाच्या नजरेतून काहीही सुटत नाही.‌ आणि 'जे आहे ते असं आहे', एवढंच ते मांडतात. अर्थनिर्णयाची जबाबदारी वाचणाऱ्यावर टाकतात.

हितसंबंधांची ही गुंतागुंतीची वॉटरटाईट साखळी. राजकारणी, उद्योगपती, वकील, जज, मिडीया, प्रशासकीय अधिकारी, पोलिस, डॉक्टर्स, जेलर्स, दलाल अशा सगळ्या लागेबांध्यांचं नातेसंबंधांचं मायाजाल ! त्याचं हे भीषण विश्र्वरूप दर्शन! ते आपण बघून थक्क, हतबुद्ध.! नैतिक अनैतिकतेच्या भल्या-बुऱ्याच्या आपल्या समजूती अगदीच बाळबोध वाटायला लागतात. या भोळ्या समजूतींवर हसू यायला लागतं

बाकी, हा चिखल काही दुरूस्त होण्यापैकी नाही. कुवतीबाहेरचं काम आहे ते. या भानगडीत कुणी पडला तर प्युअर फ्रस्ट्रेशनशिवाय दुसरं काहीही हाताला लागत नाही. यापासून चार हात लांब रहा किंवा मग त्यात लडबडा. तिसरा पर्याय नाही. अशा व्यवस्थेत चुकून एखाद्याला खरा न्याय आणि वेळेवर मिळालाच, तर तो देवदुर्लभ योग म्हणावा लागेल.

तर आपल्याला ज्या दुनियेतलं कणभरही माहीत नव्हतं, असं एक संपूर्ण वेगळं आयुष्य दिवसभरात जगून पार केलं. मोठा मानसिक प्रवास आहे हा. थकवणारा. भंजाळून टाकणारा. आता पुढचे चार दिवस एक शब्दही वाचवणार नाही.



'सिमसिम'

 गीत चतुर्वेदींची 'सिमसिम' म्हणून एक कादंबरी आहे.

एका वयोवृद्ध ज्ञानवृद्ध सिंधी मनुष्याच्या स्मृतींचा ठाव घेत ही कादंबरी उलगडत जाते.‌ वर्तमानात मुंबईत रहिवसलेला हा मनुष्य कराची-लारकाना स्मृतींतून जिवंत करत राहतो. त्याच्यासोबत आपल्यालाही आठवणींच्या या दुतर्फा उघडणाऱ्या भुयारातून टाईम ट्रॅव्हलला नेतो.

ही कादंबरी विभाजनादरम्यान सिंधी समाजावर कोसळलेल्या हाल-अपेष्टांना, यातनांना भाषा देते. ही भाषा आक्रस्ताळी, किंचाळून लक्ष वेधून घेणाऱ्यांपैकी नाही.  ही शाश्वत, सोशिक आहे. ही मूक रूदनाची भाषा आहे. ही क्रंदनाची भाषा आहे.

ही कहाणी भावनिक-मानसिक निर्वसनाची व मृत्यूबोधाची जितकी आहे, तितकीच प्रेमाची-जिंदादिलीची-उमेदीची देखील आहे.

मुंबईत लॅंडमाफियांची जागेची जी सदैव पेटलेली हवस असते, त्यातून आपली लायब्ररी वाचवायला धडपडणाऱ्या वृद्धाच्या जूनून ची ही कहाणी आहे.

यातल्या त्या लायब्ररीत पुस्तकं बोलतात, नाचतात, गातात, त्यांच्या निष्पाप भावना सांगतात, ते प्रकरण आत्म्याला स्पर्श करणारं आहे.! पुस्तकांबद्दल, लायब्ररीबद्दल अपार माया असणारा हा गोड म्हातारा, प्रेमात पडावा असा आहे.‌

आपण आत्ता ज्या सुपरफास्ट काळात थरथरत आहोत, त्या काळाचं वजन समजून घेण्यासाठी ही कादंबरी अवश्य वाचायला हवी.

गीत चतुर्वेदी हे एकविसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ भारतीय लेखकांपैकी एक आहेत. त्यांच्या एकेक कलाकृती वाचताना ते तसे का आहेत, याची झलक आपोआप मिळते. 

सिमसिम च्या इंग्रजी अनुवादाला 'पेन अमेरिका ट्रान्सलेशन ॲवॉर्ड' आहे. कारण हे सगळं तसं वैश्विकच आहे म्हणजे.

'सिंधुतील साम्राज्ये'- पुस्तक परिचय

सिंधू नदीची एक अद्भुत बायोग्राफी असं या पुस्तकाचं वर्णन करता येईल. सिंधुकाठी बहरलेल्या अनेकानेक लोकसंस्कृत्यांचा मनोज्ञ धांडोळा या पुस्तकात ...