Monday, 3 February 2025

'गुरू'-पुस्तक परिचय

नितीन कोतापल्लेंची 'गुरू' ही कादंबरी अलीकडेच, जानेवारी २०२५ मध्ये प्रकाशित झालीय. फारच आवडली. म्हणजे यात एवढी कशिश आहे की एक संपूर्ण दिवस चिटकून बसलो आणि आरपार संपवूनच टाकली. पहिली तीन प्रकरण, 'दुःख', 'तृष्णा', 'गंध', एकदम क्लास आहेत. 'दुःख' या प्रकरणात एका प्रलयंकारी पावसाचं आणि त्यामुळे हाहाःकार उडालेल्या भावी शहराचं विदारक चित्रण वाचताना सारामागोच्या ‘ब्लाईंडनेस’ची आठवण झाली. आख्खं प्रकरणभर असा कहर बरसणारा, जाणीवा सुंद करून टाकणारा पाऊस मराठीत आजवर झालेलाच नाहीये.!

एकविसाव्या शतकाच्या या पूर्वार्धातली जीवनशैली, तिची गुंतागुंत, त्याखाली रगडल्या जाणाऱ्या माणसांची नस यामध्ये नेमकेपणाने पकडलीय.‌ रिअल इस्टेटशी, नगररचनेशी संबंधित व्यवहारांतील भाषेची लेखकाला फार चांगली जाण आहे.‌ शिवाय आश्रमांचं, कार्पोरेट बुवाबाजीचं, मिडीयाचं, सोशल मिडियाचं, एकूणच सगळ्या जगण्याच्याच बाजारीकरणाचं चित्रण वास्तवदर्शी आहे. एखादा गंभीर लेखक किती अनेक अंगांनी भोवतालाचा वेध घेऊ शकतो, बाजार-व्यवस्थेकडून हे जे मायाजाल विणलं गेलंय, त्याला किती ताकदीनं भिडू शकतो, आणि ते ध्वस्तही करू शकतो, याचं हे उत्तम उदाहरण आहे.

कादंबरी एकूण सहाशे पानांची आहे. थकवणारी आहे. त्यापैकी ३३६ व्या पानापर्यंत सगळं जबरदस्त आहे.! पण तिथून पुढे जरा वेगळाच गिअर टाकलाय. तिथून वास्तवाचा सांधा सुटून कल्पिताच्या, स्वप्नाच्या प्रदेशात जास्तच वावरत गेल्यासारखी वाटते (म्हणजे मला तरी तसं वाटलं). तरीही अवश्यमेव वाचण्यासारखी आहे.

समकालीन हिंदी साहित्यात असा मोठा अवकाश निरखणारे, तेवढा दमसांस असणारे चार-पाच लेखक वाचून माहिती झाले आहेत. आता मराठीतही अशा एका दमदार कादंबरीचं आगमन झालं आहे, याचं अप्रूप/कौतुक वाटलं.



Monday, 27 January 2025

बिनकामाच्या नोंदी

 १. ओठांवर कोवळी लव फुटू लागलेल्या कॉलेजवयीन मुलांची भाषा कानावर पडते. अशी बेमुरव्वत रग कधीकाळी आपल्या आतही होती आणि तिच्या फोर्समुळे आपणही याच भाषेतून जगाशी संवाद साधत होतो, हे आठवून कसंसंच वाटतं.

तोंडातून बाहेर पडणाऱ्या कोणत्याही वाक्याचा अंत अस्ति आरंभ करायचा झाल्यास लवड्या सोडून इतर कोणता शब्दच जवळ असू नये, ही परिस्थिती मोठी आश्चर्याची वाटते. अर्थात, सगळं करून भागल्यावर आज मला तसं वाटणं साहजिकच आहे. पण सवाल इथं माझा नाहीये. सवाल, माझं नक्की काय काय करून भागलं आहे, हा ही नाहीये.

सवाल हा आहे की सभ्य नागरी समाजाचे सदस्य म्हणून जगण्याचा आपण जो ठराव पास केला आहे, त्याचं काय? तो ठराव राजरोस उद्ध्वस्त करणाऱ्या त्या विवक्षित शब्दाचं आपण काय करणार आहोत? सांगा ना काय करणार आहात? सांगा की.! तुम्हाला विचारतोय.! हे असं ऐकून न ऐकल्यासारखं करणं, हा एक मार्ग झाला. पण ती सोयीस्कर पळवाट होय. वडिलकीच्या नात्याने त्या मुलांना एखादं भाषण सुनावून पोबारा करणं, हा दुसरा एक मार्ग झाला. पण तेही तसं रिस्कीच आहे. कारण या देशात भाषण ठोकून सुरक्षित पोबारा करायची सूट फक्त एकाच माणसाला आहे.

२. पाऊस सलग सलग. बऱ्याच दिवसांनी गुडलक कॅफेच्या आसऱ्याला जाऊन बसलो, तर तिथं नेमका बोगस शिळा समोसा आणि बकवास चहा वाट्याला आला. त्यात भरीस भर म्हणजे कॉलेजमधला जगदाळे अचानक भेटला. ओळख दाखवत आला आणि खुर्ची ओढून बसलाच ऐसपैस. मग थापांचा प्रवाह सुरू झाला. " मस्त मजेत चाललंय. सध्या चाकणला असतो, मर्सिडीज बेंझ मध्ये.‌ सहकार नगरला एक बंगला घेतलाय. रिनोवेशन करायचंय. आता सेटल झालं पायजे मलापण. डिसेंबरमध्ये लग्न करतोय. बायको आयटीत असते. फोन करतो, लग्नाला ये. नंतर मग फेब्रुवारीत आमचं जर्मनीला जायचं चाललंय" वगैरे.

मी "वा ! वा ! छान छान!" करत उरकलं आणि बाहेर पडलो.
आता हा भामटा सहकारनगर वरनं चाकणला कसा जातो रोज ? उडत उडत की लोटांगण घालत? आणि याच्या बापानं तरी जर्मनीचं नाव ऐकलं होतं का? साला ऐकून घेणारा भेटला की हा चालूच होतो सुसाट. जुनी खोड गेलेली दिसत नाय अजून.

३. श्रीराम लागू रंग अवकाश ला जॉयराईड म्हणून एक नाटक होतं.‌ विभावरी देशपांडेंचं नाव बघून गेलो, पण काही खास नव्हतं.‌ नंतर नंतर तर पात्रांच्या जागी बॉसची कल्पना करायला लागलो. मग ते समोरच्या स्टेजवरून कसा कसा अभिनय करतील वगैरे कल्पना रंगवत बसून राहिलो. "नाय नाय नाय. असं चालणार नाय!" म्हणत दोन्ही हात हलवत खुर्चीतून किंचाळत उठतानाही दिसायला लागले. असं काहीबाही मनात खेळवत असतानाच नाटक संपलं. अंगाला चिटकलं नाही. दुसऱ्या मिनिटाला सॅकमधून जर्कीन काढत बाहेर पडलो.‌ संपली सगळी कलाबिला ऑन दि स्पॉट.

येताना दहीहंडीचा दणदणाट. फुल्ल ट्रॅफिक जॅम. डॉल्बीच्या भिंतींपुढून सरकतानाची दहा मिनिटं मरणप्राय. कानाच्या पडद्यावर दुखरी कंपनं आदळत राहिली. एका हाताने कान दाबून दुसऱ्या हातानं हॅंडल पकडत कसाबसा निसटलो. अजून थोडा वेळ अडकलो असतो तर पडदा फाटलाच असता. कृष्णानं पाच हजार वर्षांपूर्वी चोरून लोणी खाल्लं नसतं तर, हे सगळं या लेव्हलला गेलंच नसतं.

(असं बघ संप्या, की यात काहीतरी लिंक पाहिजे, सातत्य पाहिजे. काही ठिकाणी विस्तार पाहिजे. हे असं तुकडे तुकडे जोडत भरकन पुढं सरकणं, म्हणजे चंचलतेचं लक्षण आहे. तुझी इम्मॅच्युरिटी पुन्हा उफाळून आलीय की काय?)

. यूट्यूबवर येल युनिव्हर्सिटीचा कुणी प्रोफेसर दिसला. सांगत होता की, "समजा मी लेक्चर देत असलो आणि त्याचवेळी माझा रिलेटीव्ह आजारी असल्याची बातमी मला मिळाली; तर मी विद्यार्थ्यांना सांगेन की आत्ताच मला एक वाईट बातमी मिळालीय, पण तरीही मी प्रयत्न करेन की त्या बातमीचा माझ्यावर काही परिणाम होणार नाही.‌"
ग्रेट!! अमेरिकेत समजा असला च्युतापा खपून जात असेल. पण इथं त्याचं काय होय? इथं लोक खोटंखोटं आजारी पडून महिना महिना कामावरून फरार होतात. आणि पुन्हा येताना असंच कुठूनतरी बनावट मेडिकल सर्टिफिकेट उचलून आणतात. पाठवू काय तिकडं तुमच्या क्लासमध्ये? पाठवू?

. हा एक निराळाच प्रॉब्लेम मागं लागलाय. वेळीच आवर घातला पाहिजे. नाहीतर केस हाताबाहेर जाणार.
म्हणजे जिना उतरून खाली आल्यावर अचानक वाटतं की कुलूप लावायचं विसरलो की काय? मग चेक करायला पुन्हा जिना चढून वर जावं लागतं.

किंवा कधी मॉलमधून कार्ड पेमेंट करून कार्ड नीट पाकीटात ठेवून रस्त्याला लागतो. तरीही निम्म्या वाटेत हुरहूर लागते की कार्ड घेतलं की विसरलो तिथंच? मग बाईक साईडला घेऊन जीन्सच्या खिशातून वॉलेट काढून चेक करावं लागतं.

किंवा एखाद्याला काही कामाचा व्हॉट्सअप मेसेज पाठवायचा असतो. तसा तो पाठवतो.‌ पण थोड्या वेळानं दचकतो की तो मेसेज पर्सनल नंबरवर पाठवला की चुकून एखाद्या ऑफिशियल ग्रुपवर पाठवून दिला?? बापरे.!

आता हा मानसिक रोग आहे. आणि तो हळूहळू आपल्यावर सवार होत चाललाय, हे उघडच आहे. कारण आता हे लिहितोय तर तेवढ्यातही राहून राहून वाटतंय की सकाळी निघताना हीटर बंद केला होता ना नक्की? की राहिला तसाच?
जाऊ दे च्यायला पेटू दे एकदाच सगळं. आग लागू दे सगळी.!

६. चार दिवस जोडून सुट्टी आली. सोलो ट्रीप काढायला पाहिजे कोकणात असं नुसतं ठरवत बसलो. केलं काहीच नाही. लोळत लोळत वाचत दिवस घालवले जागच्या जागी. एकदा फक्त पॅसिफिक मॉलमध्ये जाऊन आलो. सेल्सवुमन चांगलीच बडबडी होती. पण माझा मनहूस चेहरा बघून भल्याभल्यांचा जातो तसा तिचाही कॉन्फिडन्स गेला. शर्टचा चॉईस काही वाईट नव्हता तिचा, बाय द वे.
तर मग शिक्षा म्हणून माघारी येताना सेव्हन लव्हज् चौकात छोटासा अपघात झाला. मागून एका कारनं हलका डॅश मारला. खाली पडलो. पण विशेष काय नुकसान नाही. मान्य आहे की आपण हेडफोन्स घालून बाईक चालवत होतो. पण चूक सांगण्याची ही कुठली पद्धत आहे? सरळ डॅश मारता? वगैरे काय सगळं हिंदीत विचारत बसलो नाही. कारण हिंदीत भांडायचं म्हणजे.. असो.

Friday, 3 January 2025

'द लायब्ररी'

इथे या पुस्तकाचे दोन परिचय आहेत.

परिचय क्र. १ (कधीच काहीच न वाचणाऱ्यांसाठी) :

तुम्हाला वाचनाचा तिटकारा किंवा आळस किंवा निरूत्साह असेल. पुस्तक हातात घ्यायचं जीवावर येत असेल किंवा पुस्तक बघताच अंगावर काटा येत असेल. पण तरीही कधीकधी पुस्तकांबद्दल कुतूहल वाटत असेल, तर खास तुमच्यासाठी‌ हे पुस्तक आहे-- झोरान झिवकोविचचं 'द लायब्ररी'.! अलीकडेच नीतीन रिंढे या व्यासंगी व्यक्तीनं हे मराठीत भाषांतरित केलं आहे.

छोटेखानी पुस्तक आहे, शंभरेक पानांचं. याचा आकार अगदी तळहाताच्या पंजात मावेल एवढा आटोपशीर आहे. यात वाचनासंबंधी सहा छोट्या-छोट्या कथा आहेत, ज्या अद्भुत आणि धमाल आहेत. वाचताना मौज येते. भाषा अगदी सोपी सुंदर सुटसुटीत आहे. नवीन वर्षात वाचनाची सुरूवात करायची असेल तर हे अगदी परफेक्ट पुस्तक आहे.

फक्त एवढंच करावं लागेल की हे पुस्तक मिळवावं लागेल आणि सरळ पहिल्या कथेपासून वाचायला सुरुवात करावी लागेल.‌ बाकीचे सगळे बहाणे बाजूला ठेवून, मनाचा निश्चय करून हे एवढं एक पुस्तक जरी वाचलंत तरी वाचनाची मौज काय असते, याची झलक मिळेल. कळेल की पुस्तकांपासून मिळणारा आनंद हा जगातल्या इतर कुठल्याही आनंदाहून जास्त मंगलदायी असतो, असं काही लोक का म्हणतात ते !!

आणि एक गुड न्यूज म्हणजे हे पुस्तक वाचून संपवायला फक्त दोन-अडीच तास पुरेसे आहेत.! आयुष्यातले दोन-अडीच तास कुणीही नक्कीच काढू शकतं. एवढंही काही कुणी बिझी नसतं.!

परिचय क्र. २ (वाचणाऱ्यांसाठी) :
पुस्तकप्रेमी असाल तर तुमच्यासाठी यात निव्वळ आत्मप्रत्ययाचं सुख वाट बघत आहे.‌ पुस्तकं-वाचन अशा एकजिनसी सूत्रात गुंफलेल्या सहा कथा आहेत. या सर्व कथांमध्ये जादूई वास्तववाद रचलेला आहे.

'आभासी ग्रंथालय' या कथेत अशा एका रहस्यमयी वेबसाईटची कल्पना रंगवलेली आहे की ज्यावर भविष्यातील सर्व संभाव्य पुस्तकं आधीच प्रकाशित केलेली दिसतात.

'घरातलं ग्रंथालय' या कथेतल्या एका माणसाच्या पत्रपेटीत आपोआपच ग्रंथ येऊन प्रकट होत राहतात, ते साठवता साठवता त्याला बूड टेकायलाही जागा उरत नाही.

'रात्र-ग्रंथालय' या कथेत रात्रीच्या वेळी आत्म्यांच्या ग्रंथ-संग्रहात रूपांतरित होणारं ग्रंथालय आहे.

'नरकातलं ग्रंथालय' ही कथा अजिबात न वाचणाऱ्या माणसांना मृत्यूनंतर काय मजेशीर शिक्षा दिली जाते, यावर आहे.

'लघुत्तम ग्रंथालय' म्हणजे फक्त एकाच पुस्तकाची लायब्ररी. आणि हे जादूई पुस्तक सतत वेगवेगळ्या पुस्तकांची रूपं धारण करत असतं.

'घरंदाज ग्रंथालय' या कथेत फक्त आणि फक्त हार्ड बाउंड पुस्तकंच आवडणारा एक विक्षिप्त ग्रंथ संग्राहक आहे. आणि त्याच्या संग्रहात जेव्हा एक पेपरबॅक येऊन पडतं, तेव्हा त्या घुसखोर पुस्तकापासून तो स्वतःची सुटका कशी करून घेतो याची मिश्किल कहाणी आहे.

या एकूणच पुस्तकात काही आदरणीय पुस्तकविके, मुरलेले ग्रंथपाल, चॅप्टर लेखक, तसेच acquired taste विकसित झालेले चक्रम वाचक भेटू शकतात. त्यांचे एकेक नखरे पाहून ओठांची एक कड मुडपत सुरु झालेलं स्माईल हळूहळू सूक्ष्म गुदगुल्यांमध्ये रूपांतरित होत राहतं. जरूर वाचून पहा.‌ 


Tuesday, 31 December 2024

'कौरव सभा'

 मित्तरसैन मीत हे पंजाबमधले मोठे लेखक आहेत. त्यांची कौरवसभा ही मूळची पंजाबी कादंबरी आहे, तिचा भारतीय ज्ञानपीठानं हिंदी अनुवाद केलाय.

कादंबरी अजस्त्र आहे. तिला वेग आणि खोली असं दोन्ही आहे. हातात घेतली की संपवल्याशिवाय खाली ठेवणं अवघड आहे.‌ कोर्टकचेरीच्या आणि त्यामागे चालणाऱ्या पडद्याआडच्या हालचालींच्या जंजाळात आत आत हरवत चाललो तरी "पुढं काय होणार" याची उत्सुकता सुरूवातीपासून शेवटपर्यंत ताणलेली राहते. त्यामुळे दिवसभर मॅरेथॉन रिडींग.!

मायानगर नावाचं एक काल्पनिक शहर. तिथं घडलेला एक गुन्हा आणि त्यासंबंधी चाललेली कोर्टकेस, यांचा आधार घेऊन या कादंबरीचा डोलारा उभा आहे. न्यायाची व्यवस्था सडलेली आहे आणि खालपासून वरपर्यंत सगळे आपादमस्तक बरबटलेले आहेत, हे वरवर माहित असतं. पण ते नेमकं कसं? याचं जिवंत चित्रण यात येतं. महापुरानं भरलेली नदी जशी रोरावत येताना दिसावी तशी ही कादंबरी गाळण उडवते.

लेखक स्वतः आयुष्यभर वकील राहिलेले आहेत. त्यांनी हे सगळं आतून बघितलेलं आहे. तर हे बघितलेलं भोगलेलं वास्तव यात आलेलं आहे. 'भोगा हुआ यथार्थ' !

ते या व्यवस्थेशी संबंधित सगळे कंगोरे अत्यंत बारकाईनं उलगडून दाखवतात. व्यवस्थेतला कुठलाच पैलू ते सोडत नाहीत.‌ या माणसाच्या नजरेतून काहीही सुटत नाही.‌ आणि 'जे आहे ते असं आहे', एवढंच ते मांडतात. अर्थनिर्णयाची जबाबदारी वाचणाऱ्यावर टाकतात.

हितसंबंधांची ही गुंतागुंतीची वॉटरटाईट साखळी. राजकारणी, उद्योगपती, वकील, जज, मिडीया, प्रशासकीय अधिकारी, पोलिस, डॉक्टर्स, जेलर्स, दलाल अशा सगळ्या लागेबांध्यांचं नातेसंबंधांचं मायाजाल ! त्याचं हे भीषण विश्र्वरूप दर्शन! ते आपण बघून थक्क, हतबुद्ध.! नैतिक अनैतिकतेच्या भल्या-बुऱ्याच्या आपल्या समजूती अगदीच बाळबोध वाटायला लागतात. या भोळ्या समजूतींवर हसू यायला लागतं

बाकी, हा चिखल काही दुरूस्त होण्यापैकी नाही. कुवतीबाहेरचं काम आहे ते. या भानगडीत कुणी पडला तर प्युअर फ्रस्ट्रेशनशिवाय दुसरं काहीही हाताला लागत नाही. यापासून चार हात लांब रहा किंवा मग त्यात लडबडा. तिसरा पर्याय नाही. अशा व्यवस्थेत चुकून एखाद्याला खरा न्याय आणि वेळेवर मिळालाच, तर तो देवदुर्लभ योग म्हणावा लागेल.

तर आपल्याला ज्या दुनियेतलं कणभरही माहीत नव्हतं, असं एक संपूर्ण वेगळं आयुष्य दिवसभरात जगून पार केलं. मोठा मानसिक प्रवास आहे हा. थकवणारा. भंजाळून टाकणारा. आता पुढचे चार दिवस एक शब्दही वाचवणार नाही.



'सिमसिम'

 गीत चतुर्वेदींची 'सिमसिम' म्हणून एक कादंबरी आहे.

एका वयोवृद्ध ज्ञानवृद्ध सिंधी मनुष्याच्या स्मृतींचा ठाव घेत ही कादंबरी उलगडत जाते.‌ वर्तमानात मुंबईत रहिवसलेला हा मनुष्य कराची-लारकाना स्मृतींतून जिवंत करत राहतो. त्याच्यासोबत आपल्यालाही आठवणींच्या या दुतर्फा उघडणाऱ्या भुयारातून टाईम ट्रॅव्हलला नेतो.

ही कादंबरी विभाजनादरम्यान सिंधी समाजावर कोसळलेल्या हाल-अपेष्टांना, यातनांना भाषा देते. ही भाषा आक्रस्ताळी, किंचाळून लक्ष वेधून घेणाऱ्यांपैकी नाही.  ही शाश्वत, सोशिक आहे. ही मूक रूदनाची भाषा आहे. ही क्रंदनाची भाषा आहे.

ही कहाणी भावनिक-मानसिक निर्वसनाची व मृत्यूबोधाची जितकी आहे, तितकीच प्रेमाची-जिंदादिलीची-उमेदीची देखील आहे.

मुंबईत लॅंडमाफियांची जागेची जी सदैव पेटलेली हवस असते, त्यातून आपली लायब्ररी वाचवायला धडपडणाऱ्या वृद्धाच्या जूनून ची ही कहाणी आहे.

यातल्या त्या लायब्ररीत पुस्तकं बोलतात, नाचतात, गातात, त्यांच्या निष्पाप भावना सांगतात, ते प्रकरण आत्म्याला स्पर्श करणारं आहे.! पुस्तकांबद्दल, लायब्ररीबद्दल अपार माया असणारा हा गोड म्हातारा, प्रेमात पडावा असा आहे.‌

आपण आत्ता ज्या सुपरफास्ट काळात थरथरत आहोत, त्या काळाचं वजन समजून घेण्यासाठी ही कादंबरी अवश्य वाचायला हवी.

गीत चतुर्वेदी हे एकविसाव्या शतकातील सर्वश्रेष्ठ भारतीय लेखकांपैकी एक आहेत. त्यांच्या एकेक कलाकृती वाचताना ते तसे का आहेत, याची झलक आपोआप मिळते. 

सिमसिम च्या इंग्रजी अनुवादाला 'पेन अमेरिका ट्रान्सलेशन ॲवॉर्ड' आहे. कारण हे सगळं तसं वैश्विकच आहे म्हणजे.

Wednesday, 11 December 2024

काही वाचननोंदी - २

१. गुणवंत शाह यांचं 'अस्तित्वाचा उत्सव'.!
हे ईशावास्य उपनिषदावर आहे. म्हणजे त्यातला एकेक श्लोक चिंतनासाठी घेऊन लाईफटाईम रिलॅक्सिंग मैफिल रंगवलेली आहे. रजनीशांनीही ईशोपनिषदावर प्रवचनं दिलेलीयत पूर्वी, पण हा आशय त्याहून उजवा वाटतो.
प्रदीर्घ डिप्रेशन, सिनीसीझम, ठराविक काळाने येणारं सेल्फ डिस्ट्रक्टींग विचारांचं आवर्तन, पराकोटीची व्याकुळता, परात्मभाव, विलगता, मिनींगलेसनेस, नथिंगनेस अशा जीवन-अवस्थांसाठी हे चांगलं आहे.
'टू बी ऑर नॉट टू बी?'. 'आता काय करू?'. एकच सवाल आहे. एकच रोकडा सवाल आहे. आता पळायला जागा नाही. आत्ता या क्षणी या क्षणाचा सामना करावाच लागणार आहे. काहीतरी तड लावावीच लागणार आहे.‌ हा प्रश्न आता पुढे ढकलता येण्यासारखा नाही. तो ऑप्शनच नाही. हे कसं हॅंडल करणार ? कळत नाही.! 'सिदन्ति मम गात्राणि' म्हणत हातपाय गाळून बसलेल्या अर्जुनासारखी स्थिती !
भयाण रिकामपण घेऊन वेळा येतात. सगळं आतल्या आत थिजून बसतं. आता करू तर काय करू ? आणि कशासाठी करू? सगळं डवांडोल.! इंटरेस्टच खतम.
कसलीही हालचाल करू म्हटलं तरी अर्थ दिसत नाही. मन एकेक करून सगळ्यालाच नकार द्यायला लागतं. एक काळोखी गर्त भयकातर. अथाह पोकळी. नथिंगनेस जडशीळ आकार ऊकार नसलेला. कसं हॅंडल करायचं ?
अशा वेळांसाठी हे पुस्तक औषधी आहे. काही नाही. उघडून फक्त एक-दोन पानं डोळ्यांपुढून सरकू द्यायची. मनाची अवस्था आधीसारखी राहत नाही. जीवेषणा परतून येते. एक रिलीफ, एक ट्रॅंक्विलीटी.! आह्!
पण हे पुरवून पुरवून वापरायचं आहे. थोडं थोडं चमचा चमच्यानं एकेक घोट.‌ एकेक पान वाचून, मुरवून, त्याच्या अर्थाचा जगण्यात शोध.‌ वाचता वाचता थोडं थोडं मन सुटतं. मौन उतरतं. यावर हात ठेवून ध्यान करावं, वाटतं. करावं. हे पुस्तकच सखोल ध्यानातून, चिंतनातून आलेलं असावं.
२. आयन रॅंडची ॲटलास श्रग्ग्ड आणि फाऊंटनहेड ही दोन पुस्तकं ऐन तारुण्यात वाचली की माणूस भारावून जातो. दहा वर्षांपूर्वी भेटेल त्याला ही रिकमेंड करत होतो.
आजकाल आणखी एकदा चाळतो. पुस्तकं तीच, मजकूर तोच. मधल्या काळात खाजगीकरणाचे फटके खात शोषित झालेलो, त्यामुळे आधीचं भारावून जाणं वजा झालं. आता तिच्या युक्तिवादातल्या कमजोर जागा लक्षात येतात. मॅडम ज्या आदर्श भांडवलशाही व्यवस्थेचं तत्वज्ञान मांडतायत, ते फक्त फॅंटसीतच शक्य आहे.
ही पुस्तकं १९४०-५० च्या दशकात लिहिली गेलीयत. तो काळ कम्युनिझमच्या जोराचा होता. तर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मॅडमनी हे ऑब्जेक्टिव्हिजम चं तत्वज्ञान मांडलं. व्यक्तीवाद.! मी, माझं, माझ्यापुरतं.! आणि तसं जगण्यासाठी भांडवलशाही अर्थव्यवस्था ही आदर्श व्यवस्था.! तिच्या उदात्तीकरणासाठी मॅडमनी मस्त लेखणी झिजवलेली आहे. टोलेजंग बॅटिंग केलेली आहे.
आता कम्युनिझमचा काळ कधीच मागे पडलेलाय.‌ कम्युनिस्ट त्यांच्या मरणानं मरून गेलेत. पण तरीही लेखिकेच्या कादंबऱ्यांत कल्पिलेले प्रतिभावंत उद्योजक कुठे प्रकट झालेले दिसत नाहीत.‌ आजकालचे जे बिग जायंट उद्योजक म्हणवतात, ते माफिया/कार्टेल च आहेत. यांना कसली फिलॉसॉफी न् कसलं काय? हे भामटेच आहेत सरळसरळ.
तर आता लेखिकेच्या पल्लेदार भाषेचा फुलोरा बाजूला सारून नीट बघितलं तर उरतात तिचे ते सुपरमॅन नायक-नायिका.!!हार्वर्ड रॉर्क, डॉमिनिक फ्रॅंकन, गेल वायनांड, फ्रॅंको डॅंकोनिया, डॅग्नी टॅगार्ट, हॅंक रिअर्डन वगैरे.! आणि त्यांचे लांबलचक मोनोलॉग्ज, डायलॉग्ज..! ते वाचा, दूरूनच रामराम करा आणि विसरून जा.! हिचा ॲटिट्यूड आता डोक्यात जायला लागला आहे.
बाकी, लेखिकेने सोशल सिक्युरिटी किंवा आर्थिक दुर्बलांना व्यवस्थेकडून दिली जाणारी मदत वगैरे गोष्टींना आयुष्यभर विरोध केला. कारण आर्थिक दुर्बल म्हणजे मिडिऑकर.! सर्वसामान्य. ॲव्हरेज जनता पब्लिक.! तर अशांविषयी खास अमेरिकन तुच्छताभाव किंवा परात्मभाव.!‌ आणि मॅडमवर स्वतःवर म्हातारपणात वेळ आली तेव्हा सगळे सोशल सिक्युरिटीचे, मेडिकेअर वगैरेचे लाभ मिळवले. स्वतःचं तत्वज्ञान स्वतः तरी पाळायला पाहिजे होतं. असो.‌ तर हेच साठाव्या वर्षी वाचलं तर कदाचित अजून टाकाऊ वाटायला लागेल. बघूया.
३. राहुल सांकृत्यायन यांचं 'घुमक्कड-शास्त्र'.‌ हे भटकंती बद्दलचं, भटकंतीची जी आदिम मानवी प्रेरणा असते, त्या प्रेरणेचं आहे. हे पुस्तक भटकंतीचं तत्वज्ञान उभं करतं. भटकंतीला एक पवित्र गोष्ट मानतं. आयुष्यभर पत्करलेला धर्म, साधना किंवा व्रत मानतं.
जातिवंत पॅशनेट भटक्या लोकांनी वाचावं. कुणीतरी समानधर्मी भेटल्यावर मन जसं प्रसन्न होतं, तसं होईल.‌ सुरसुरी येईल.‌ भटकंतीकडे निव्वळ टाईमपासच्या पलीकडे जाऊन बघता येईल. त्यातून एक मनोभूमिका निश्चित होईल. या वाटेवर सोबतीला एक तत्वज्ञ-गुरू म्हणून हा लेखक, तसेच आजवरचे अनेक थोर देशी विदेशी अस्सल भटके आपल्यासोबत आहेत, याबद्दल कृतज्ञता वाटेल.
लेखकानं चाळीस वर्षांच्या भटकंतीच्या अनुभवांचा अर्क या १६० पानांच्या पुस्तकात उतरवला आहे. वेगवेगळी प्रकरणं आहेत. उदाहरणार्थ अथातो घुमक्कड जिज्ञासा, जंजाल तोडो, वय, स्वावलंबन, कला, घुमक्कड-धर्म, प्रेम, देशज्ञान, मृत्यूदर्शन, लेखन, निरूद्देश, आठवणी इत्यादी.‌ अशा वेगवेगळ्या अंगांनी 'भटकंती-शास्त्राचा' वेध घेतला आहे. पुढे मागे ऑक्सफर्ड केंब्रिज वगैरेमध्ये भटकंती-शास्त्राचा एखादा कोर्स निघाला तर हे पुस्तक संदर्भ ग्रंथ म्हणून लावलं जाईल, असा आबाद आशय आहे. मोठं काम आहे.
पहिल्या दर्जाचा 'परिपूर्ण' भटक्या होण्याचे लेखकाचे निकष कठोर, पण मजेशीर आहेत. ते रक्तातच असावं लागतं. भटकंतीचं बीज कुठंतरी आतच असावं लागतं वगैरे. तर लेखकाच्या शास्त्रानुसार पहिल्या दर्जाचा भटक्या होणं कठीणे. आपण कदाचित आठव्या नवव्या दर्जाचा भटक्या होऊ शकू.
पुस्तक माझ्या दुप्पट आयुष्य जगलेलं आहे. जवळपास पंचाहत्तर वर्षांचा टाईम ट्रॅव्हल करून हातात आलंय. ही प्रत देश स्वतंत्र झाला त्या आसपासची आहे.‌ तारखेवर हात फिरवतो, तेव्हा थरारल्यासारखं होतं. तेव्हा नवंकोरं असलेलं हे पुस्तक आज वयोवृद्ध झालंय, पण चांगल्या साहित्याला काही कालमर्यादा नसते. भटकंतीतून मिळणाऱ्या आनंदाची फारशी कल्पना नाही, पण हे वाचताना मिळालेलं सुख मात्र अनुपम होतं.‌
४. काश्मीरबद्दल भरपूर लिहिलं गेलंय. प्रत्येकाचे आपापले अजेंडे असतात. त्याप्रमाणे आपापल्या सोयीचे निष्कर्ष काढून मोकळे होतात. पण मानव कौल‌ यांची 'रूह' खरोखरंच चांगली कादंबरी आहे. व्यक्तिगत आहे. स्वतःवरचं भूतकाळाचं ओझं उतरवण्याची असोशी आहे. मानव कौल काश्मिरी पंडित आहेत. लहानपणी स्थलांतरित व्हावं लागलं, मग आयडेंटिटी क्रायसिस दीर्घकाळ. त्यातून मग ते तिथे परतून गेले, फिरले, राहिले काही काळ आणि लिहिलं.
यातून काश्मीरचा गंध, काश्मीरियतचा आत्मा स्पर्शिण्याचा प्रयत्न केलाय.‌ आठवणी हृद्य आहेत. माणसानं माणसासाठी लिहावं, हा लेखकाचा धर्म ते सोडत नाहीत. कौल फारच नाजूक तरीही स्थिर हातांनी लिहितात. अवघड सत्यंही हळूवारपणे आणि कल्पकतेनं सांगितली तर अंगावर येत नाहीत, हे त्यांना माहितीय. निर्बुद्ध झुंडींच्या युगात असंही लिहिणारा एकजण आहे, हे आश्वासक आहे.
विनय हर्डीकरांचं 'व्यक्ती आणि व्याप्ती'.! यातले म. द. हातकणंगलेकर, गोविंद तळवलकर आणि स्वामी अग्निवेश यांच्यावरचे लेख अप्रतिम. पर्सनल टच असलेली, संतुलित, बहारदार आणि गोळीबंद व्यक्तिचित्रणं. व्यक्तीचित्रणं लिहावीत तर अशी. हर्डीकर आवडले आपल्याला.!
५. सरिता आवाड यांचं 'हमरस्ता नाकारताना' हातातून सोडवत नाही. फार च चांगलं आत्मचरित्र.! लक्ष्मीबाई टिळकांच्या 'स्मृतीचित्रे'चं मराठी साहित्यात जे स्थान आहे, हे त्याच दर्जाला जाणारं काम आहे.
आईशी, म्हणजे सुमती देवस्थळेंशी, लव्ह-हेट रिलेशनशिप. पीळ दोघींचा खास. आईबापाविषयी, सगळ्यांविषयीच असं माणूस म्हणून बघता आलं पाहिजे. समजूतदार, ठाम आत्मविश्वासपूर्ण लिखाण. हा काळाचा दस्तऐवज. सोपी सरळ वाक्यं. पण वाचताना वेगवेगळ्या भावना उमटतात. लेखिकेला चांगलं जगता आलंय. स्वतः जी वाट निवडली, त्यावर चालताना जे भलं बुरं समोर आलं ते सोसताना लेखिका कमी पडलेली नाही. साठाव्या वर्षी लिहिलंय, त्यामुळे एवढी प्रगल्भता आली असावी. वाचून झाल्यावर छातीवर वजन ठेवल्यासारखं वाटतंय. लेखिकेने हे लिहून स्वतःचं ओझं कमी केलेलं दिसतंय. ते ओझं आता आपल्यावर आलं.!
व. दि. कुलकर्णींचं 'ज्ञानेश्वरी: एक अपूर्व शांतिकथा'! वदि ज्ञानेश्वरीच्या प्रेमात पार बुडालेले आहेत.‌ ओव्या आणि त्यातली सौंदर्यस्थळं उलगडून दाखवताना किती बोलू आणि काय बोलू, असं झालंय यांना.! माणसानं प्रेयसीबद्दल बोलावं तसं हे ज्ञानेश्वरी बद्दल बोलतायत.‌ हे म्हणजे हाडाचा शिक्षक आहेत. माठातल्या माठ माणसालाही हे ज्ञानेश्वरीची जादू दाखविल्याशिवाय सोडायचे नाहीत. भारी!!
६. दिलीप माजगावकरांचा 'पत्र आणि मैत्र' पत्र-संग्रह. यात त्यांनी लेखकांना पाठवलेली पत्रं आहेत. माजगावकर एवढं सही लिहितात, माहित नव्हतं.‌ कदाचित ते फक्त राजहंसच्या आतल्या वर्तुळातच माहिती असणार. एवढी वर्षें हा माणूस पडद्यामागं राहून कसल्या कसल्या खिंडी लढवत होता, जेणेकरून चांगली पुस्तकं लोकांपर्यंत यावीत.! चित्रकार सतीश देशपांडेंच्या मुलाला त्यांनी पाठवलेलं पत्र, अस्सल सोनं आहे म्हणजे. विचारसरण्यांवरच्या त्यांच्या कमेंट्स, निरीक्षणं फ्रेश आहेत. चांगली स्वच्छ संपादकीय दृष्टी लाभलीय त्यांना !!
एकूण माजगावकर आदरास पात्र आहेत.! बाकी, सारंग दर्शने समजा संघाचे असले तरी प्रस्तावना चांगली लिहिलीय.‌ आवडली. आणि अंबरिश मिश्रचा लेखही!
७. आनंद करंदीकरांचं 'वैचारिक घुसळण'! एकेक इश्यू, प्रश्न विचारार्थ घेतात आणि तो अनेक अंगांनी निरखून पाहतात. जाम रिसर्च करून लिहितात. चिरेबंदी काम. लिहिण्याचे विषय विपुल रेंजचे आहेत. समकालातले आहेत. एखादा लेख कसा लिहावा, विचार कसा करत जावा, याचे डेमो च सापडतात यात.
आणि नर्मविनोद सहज, ओढूनताणून नाही. बुद्धिमत्तेची चमक.
आणि उपहास वक्रोक्ती ओरिजनल.
आता हे लेख वाचल्यावर अभिजीत वैद्य चं 'शब्दांचीच शस्त्रे' वाचवेना. लिटरेचर इन हरी. राजकीय घडामोडींना तात्काळ दिलेला प्रतिसाद! घडामोडी शिळ्या होऊन गेल्यावर हेही होऊन बसतं.
भावार्थ मधून विजय पाडळकरांचं अकिरो कुरासावा वरचं आणि गुलजार च्या सिनेमांवरचं पुस्तकं आणली, चाळून संपवली. खूप जुने सिनेमे आहेत हे. ठिकठाक आहे. राजीव जोशींचा 'धूपघडी' आवडला नाही. खूप लांब पल्ल्याच्या, दीर्घकविता आहेत. धाप लागते. छोट्या छोट्या ठीक. त्यांचा 'दो पंक्तियों के बीच' चांगलाय.
भारत सासणेंचं 'रक्तातल्या समुद्राचं उधाण'. हृद्य पुस्तक. चांगला वेळ गेला वाचताना. गंभीर चिंतनशील अलवार लिखाण. सासणे पात्राचं आयुष्य उभं करतात. उथळ कमेंट्स करत नाहीत. निरीक्षणं जबरी आहेत. त्यात सहानुभाव आहे. हे असं मूलद्रव्य एखाद्याच्या आतच असलं पायजे. इकडून तिकडून उसनं आणता येत नाही.
८. असीम छाब्रा चं इरफान खान वरचं पुस्तक. एक ऐसा कलाकार जिसकी आंखे अफसाना लिखती है. इरफानचे सिनेमे मुलाखती पुन्हा एकदा बघावेत, यात लिहिलेल्या काही जागा कन्फर्म करायला. पुस्तक चांगलंय. लेखक इरफानचा डाय हार्ड फॅन आहे, हे स्पष्टच आहे. पण शब्दसंपदा कमी पडतेय. ‘याला तोड नाही' हा शब्दप्रयोग वारंवार येतोय. बाकी, इरफानवर जेवढं लिहिलं जाईल तेवढं कमीच आहे. त्याच्यावर भाष्य करायचं म्हणजे तितक्याच तोलामोलाचा कुणीतरी लेखक पाहिजे.
असेच आपल्याकडे गिरीश पांडुरंग कुलकर्णी आहेत.! पूर्वी लोकसत्तेत 'बहरहाल' म्हणून एक इंटेन्स सदर लिहायचे. तेवढ्या एका सदरा साठी रविवारी पेपर घ्यायचो.‌ तर त्यांनी जरा आणखी लिहायचं मनावर घेतलं पाहिजे. भाषेचं भलं होईल. शब्दांची निवड फारच अनवट असते त्यांची.‌ बाकी ते म्हणजे सरळसरळ इंटलेक्चुअलच आहेत. एकदम गहिरं पाणी. मुलाखती आहेत यू ट्यूबवर.‌ बोलायला लागले की चिंतनाचा वनसायडेड प्रपात कोसळत राहतो. आपल्या छोट्या तांब्यात किती भरून घेणार! तर, त्यांनाही आणखी चांगले मुलाखतकार मिळायला हवेत. नाहीतर मग सुमार यूट्यूबर्सचा सुळसुळाट आहेच. काही वाचन नाही, काही आकलन नाही, काही गांभीर्य नाही. पुढचा माणूस कुठल्या लेव्हलवरून बोलतोय, आणि आपण त्याला काय विचारावं, याची समज नाही. समजा कधी साक्षात गौतम बुद्ध समोर येऊन बसले, तरी हे 'तुम्हाला कुकींग येतं का?' विचारतील.! हो ना.. नाहीतर काय.! यांना कोण अडवणार ना!
९. फूटपाथवर जुन्या पुस्तकांचा ढिगारा उपसताना हात धूळीनं माखतात. पण यान मार्टेल चं beatrice and Virgil, सापडलं शंभर रूपैला. कोण कुठलं लंडन आणि कुठलं हाईड पार्क.‌! त्याला तिथं झालेला तो साक्षात्कार इथं बसल्या बसल्या जाणवतो. ही लेखकाची ताकद. या शब्दकळेशी आपण नवखे, तेव्हा जरा काही समजलं की भारी वाटतं. आपलं हे calf love कधी थांबणार.! साला सुरूवात एवढी चांगली केली होती पण नंतर ट्रॅक सुटला, फाफलला यान मार्टेल. मध्येच हे पानंच्या पानं भरून नाटक, फ्लॉबेर, प्राणीसंग्रहालय वगैरे कशासाठी लिहिलंय?
१०. ट्रेवर नोआ चं 'बॉर्न अ क्राईम'. डार्क ह्युमर आहे. चांगलं पुस्तक. चांगला अनुवाद. बारावीतल्या मुलीनं हा मराठी अनुवाद केलाय.! आफ्रिकेतल्या कृष्णवर्णीय समाजरचेनेचे अंतरंग. झोपडपट्टीतलं अर्थशास्त्र, तुरूंग, डिस्क्रिमिनेशन. लहानपण, भूक. प्रेमप्रकरणं. काळा बाजार. पोलिस. वर्णभेदी टिपण्या. पूर्वग्रहदूषित नजरा. ऐन तारुण्यात या सगळ्याकडे एवढं तटस्थपणे बघायला कसं जमत असेल! हे सगळं झेलत हा विख्यात स्टॅण्ड अप कॉमेडीयन होऊन बसलाय. स्ट्रगल खतरनाक आहे. आपल्या सारख्याला याचं वारंही झेपणार नाही. आपण म्हणतो की फक्त आपल्याकडेच हे क्रूर प्रकार चालतात. नाही, माणसं सगळीकडे सारखीच वेडझवी असतात.‌

'कुब्र.'

 'कुब्र' म्हणजे निबिड, अनाघ्रात अरण्य. हे पुस्तक अशा अरण्याचं आहे. काळवेळाचे साखळदंड विसरून, दीर्घ काळ अरण्यात राहून, निर्भार रेंगाळून झाल्यावर मनात जे समृद्ध अरण्य कायमचं वस्तीला येतं, हे त्यावर लिहिलेलं पुस्तक आहे.

लेखकाच्या ठायी तत्त्वचिंतक, संशोधक आणि कवी अशा तीन वृत्तींचा दुर्लभ संगम झालेला आहे. जे दिसलं, जे अनुभवलं ते सगळंच्या सगळं टिपता येणं हेच मुळात दुष्कर. आणि पुन्हा ते सगळं जसंच्या तसं इतरांपर्यंत पोहचवणं, हे त्याहून कठीण. त्यासाठी जी जादुई प्रतिभा लागते, ती या लेखकावर मेहेरबान झाली आहे.

या पानांमधून प्रवास करत, आपण त्या कुब्र च्या गाभ्यात, त्या निबिड अरण्यात दाखल होतो, डुबून जातो. हरवतो. लेखकानं टिपलेली अरण्याची घनगंभीर स्पंदनं टिपत राहतो स्तब्ध.

हे काही एका दमात वाचून सुटका करून घेण्यासारखं नाही. श्वासात भिनत जाणारं लिखाण आहे हे. म्हटलं तर फार फार बारकाईनं केलेलं काम आहे. म्हटलं तर व्यासांसारखं महाकाव्य आहे.

यातली कुठलीही नोंद वाचायला घ्यावी, मनाची अवस्था बदलून जाते. जीवनाच्या जाणिवेची संथ अंतर्धारा वाहते ओळींतून. कान देऊन ऐकत रहावी. ओळींतून मन झिरपतं. स्वतःला गाळून घेतं. हिणकस वरती राहतं. निखळ अस्तित्वाचं भान खाली उतरतं. असा हा मग्न, आत्मस्थित ऋषी, अरण्य उपनिषद लिहितो.!!
अफाट पसारा आहे. कसं न्याहाळायचं हे कोडं? कशी आणावी दृष्टी? कुतूहल आहे.!
एकेक घटना घडत आहेत. घटना सुट्या सुट्या नाहीत. त्यामागे एकसलग जैवसाखळी आहे. कार्यकारण भाव आहे. स्वतःची अशी नैसर्गिक लय आहे. मृतदेहांचं विघटन होतंय. मगरीकडून सावज टिपलं जातंय. अजगर चितळ गिळतंय. रानकुत्र्यांची झुंड हरणास घेरतेय. एकेक चित्तथरारक नाट्यं.! वाचताना श्वास अडकतोय. एकेक घटना घडत आहेत!

क्रोर्य, करूणा, भय, व्याकुळता, शहाणीव यांची हलती क्षणचित्रं सरकतात डोळ्यांसमोरून. आणि या सर्वांप्रती लेखकाचा विलक्षण साक्षीभाव! यानं स्वतःभोवती अरण्याची दुलई पांघरलेली आहे, अरण्याची लय-कंपनं याच्यात झिरपली आहेत. हा अरण्यात विरघळून गेलाय, स्वतःचं अस्तित्व जाणवू देत नाही. वाचकांनी आपापल्या पंचेद्रियांनी हा अनुपम सोहळा अनुभववावा. याच्या लिहित्या बोटांना अद्भुताचा स्पर्श झालेला आहे.!

अरण्यातलं ऋतूचक्र सूक्ष्म गतीनं बदलताना पाहतोय.‌ ऋतूंचे सांधे बदलताना पाहतोय. त्याचे जीवसृष्टीवर होणारे परिणाम पाहतोय. लय-विलयाचं अनादि अनंत चक्र पाहतोय. हा फक्त पाहतोय. जे जसं घडतंय तसं पाहतोय. त्याला स्वतःची टिप्पणी जोडत नाही. पण एक आख्खी कादंबरी लिहून जे सांगता आलं नसतं, ते जीवनाचं समग्र नाट्य हा फक्त एका नोंदीमध्ये रचतोय. त्या क्षणबिंदूंचं संचित, त्यांचा अर्क आपल्यापुढे ठेवतोय. हा फक्त पाहतोय.!

याचा इंग्रजी आणि इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद होणं आवश्यक आहे. हे इतर भाषांमध्ये पोहचणं आवश्यक आहे.‌ कारण हे सगळं फार वैश्विक आहे. अर्थात, ही गूढ अरण्यलिपी वाचण्यासाठी लेखकानं स्वतःची जी धाराप्रवाह आरस्पानी मराठी घडवलेली आहे, तिचा अनुवाद करणं काही सोपं असणार नाही.



'गुरू'- पुस्तक परिचय नितीन कोतापल्लेंची 'गुरू' ही कादंबरी अलीकडेच, जानेवारी २०२५ मध्ये प्रकाशित झालीय. फारच आवडली. म्हणजे या...