१९५०च्या दशकात चीनने तिबेटचा कब्जा घेतला. भारतातून दरवर्षी अनेक यात्रेकरू तिबेटमार्गे कैलास-मानसला पायी पायी जायचे. हा पारंपरिक मार्ग चीनने परदेशी नागरिकांसाठी बंद केला. ठिकठिकाणी चिनी सैनिकांचे कडक चौकी पहारे बसले. त्या काळात, चिनी सैनिकांपासून बचाव करत लेखकाने सदर मार्गावरून प्रवास केला. त्याअर्थाने लेखक त्या मार्गावरचे 'अखेरचा प्रवासी' आहेत.
(आपल्याकडचे धर्मानंद कोसंबी आणि महापंडित राहुल सांकृत्यायन तिबेटला गेले होते, पण ते फार आधी.! सांकृत्यायन यांच्या 'मेरी तिब्बत यात्रा', कोसंबी यांच्या 'निवेदन' या पुस्तकांतून तात्कालीन तिबेटसंबंधी सुंदर वर्णन आहे. या दोघांनी मोठ्या कष्टानं तिबेटमधून बौद्ध धर्माशी संबंधित प्राचीन ग्रंथसंपदा, दुर्मिळ हस्तलिखितं मिळवून भारतात आणली आणि नंतर ते भांडार जगासाठी खुलं झालं. असो.)
तर या प्रवासादरम्यान लेखक बिमल डे यांनी लिहिलेली डायरी म्हणजे हे पुस्तक. लेखक मूळचे कलकत्त्याचे. शाळकरी वयात घरातून पळून गेले. काही काळ अशीच मनातील उमाळ्यांवर बेतलेली भटकंती करत राहिले. मग एके ठिकाणी त्यांना एक 'गुरुजी' भेटले. पुस्तकात वर्णन केल्यावरून हे गुरुजी म्हणजे एक पितृतुल्य, परिपक्व, आदरणीय माणूस असावेत, असं वाटतं. तर हा पोरसवदा लेखक त्या गुरुजींसोबत एका नेपाळी यात्रेकरूंच्या जथ्थ्यांत सामील झाला आणि तिबेटला गेला. जवळ कसलेही रिसोर्स नसताना निव्वळ भगवान-भरोसे केलेला हा प्रवास आहे. लेखकानं आपल्या या पुस्तकाचं वर्णन 'एका भिकाऱ्याची डायरी' असं केलेलं आहे. परंतु ते तसं अजिबातच नाही आहे. एक वेगळ्याच प्रकारची श्रीमंती, आंतरिक समृद्धी या संबंध पुस्तकात ठायी ठायी अनुभवास येते. तिबेटच्या अगदी अंतर्भागातील लोकजीवन, त्यांचं आदरातिथ्य, मानवी स्वभावांचे नमुने, त्या प्रदेशाचं अत्यंत उत्कट असं निसर्गवर्णन, प्रवासात भेटलेल्या बौद्ध लामांचे अनोखे अनुभव वाचायला मिळतात. 'असंच उठून सगळं सोडून तिबेटला जावं' असं वाटायला लावण्याजोगं एक सुंदर प्रवासवर्णन/ जीवनवर्णन झालेलं आहे हे.
चित्रस्त्रोत: google.com

No comments:
Post a Comment